शिक्षण फक्त १२ वी, पण टॅलेंट जबरदस्त! जळगावच्या वंदना यांचा भन्नाट व्यवसाय, महिन्याला करताय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला उद्योग आज ग्रामीण विकासाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
जळगाव : जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला उद्योग आज ग्रामीण विकासाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. वंदना प्रभाकर पाटील या महिलेने भाजीपाला निर्जलीकरण आणि पावडर निर्मितीचा व्यवसाय उभारून शेतकरी व महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. बाजारात दर न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा माल वाचवतानाच, गावातील महिलांना रोजगार देत त्या स्वतःच्या पायावर ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.
भाजीपाल्याला भाव न मिळाल्याने शोधला नवा मार्ग
वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती असून त्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत होत्या. मात्र उत्पादन भरपूर येताच बाजारभाव घसरत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला निर्जलीकरण करून त्याचे मूल्यवर्धन करता येते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला.
advertisement
कृषी प्रशिक्षणातून उद्योजकतेकडे वाटचाल
या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून माहिती घेतली आणि आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले. आत्मविश्वासाच्या जोरावर पळासखेडा या गावात सहा महिन्यांपूर्वी त्यांनी भाजीपाला निर्जलीकरण प्रकल्प सुरू केला. गावातील काही महिलांना सोबत घेत ‘गायत्री फूड्स’ या नावाने उद्योगाची सुरुवात झाली.
सरकारी योजनेचा मिळाला आधार
या उद्योगासाठी शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना अंतर्गत सुमारे पावणे सहा लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. याशिवाय पावणे दोन लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने प्रकल्प उभारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि व्यवसायाला बळकटी मिळाली.
advertisement
नैसर्गिक पद्धतीने तयार होणारी भाजीपाला पावडर
या युनिटमध्ये कांदा, टोमॅटो, बीट, शेवगा, मेथी, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं तसेच केळीच्या कांड्यांची पावडर तयार केली जाते. भाजीपाला प्रथम स्वच्छ धुवून कापला जातो, त्यानंतर सौर ऊर्जेच्या साहाय्याने नैसर्गिक पद्धतीने सुकवला जातो. त्यामुळे रंग, चव आणि पौष्टिकता टिकून राहते.
वाढती मागणी आणि आर्थिक यश
पूर्णतः रसायनमुक्त आणि नैसर्गिक असल्याने या पावडरला मोठी मागणी आहे. आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने जळगावसह पुणे, नाशिक, मुंबई आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांतून ऑर्डर्स वाढत आहेत. सध्या दरमहा सरासरी दोन लाख रुपयांची उलाढाल होत असून व्यवसाय वेगाने वाढत आहे.
advertisement
ग्रामीण महिलांसाठी रोजगाराची संधी
या प्रकल्पामुळे गावातील १० ते १५ महिलांना नियमित रोजगार मिळाला आहे. शेतीखेरीज पर्याय नसलेल्या महिलांना आता घराजवळच काम मिळत असून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावता येत आहे. कामातून सन्मान आणि आत्मविश्वास मिळत असल्याने महिलांमध्ये समाधानाची भावना आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 7:25 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शिक्षण फक्त १२ वी, पण टॅलेंट जबरदस्त! जळगावच्या वंदना यांचा भन्नाट व्यवसाय, महिन्याला करताय लाखोंची कमाई






