मीरा-भाईंदर: ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदर परीसरात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथं एका १२ वर्षीय मुलीचे तब्बल २०० हून अधिक नराधमांनी लचके तोडले आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. अखेर मीरा भाईंदर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने तिची सुटका केली आहे. तिच्यावर झालेली आपबिती ऐकून तपास अधिकाऱ्यांसह सर्वच जण सुन्न झाले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय पीडित मुलगी ही मुळची बांगलादेशी आहे. अलीकडेच ती शाळेत नापास झाली होती. नापास झाल्यामुळे घरचे ओरडतील, या भीतीने ती घरातून पळून गेली होती. याच वेळी एका महिलेनं तिला गोड बोलून तिला भारतात आणलं. यानंतर ती मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली. तीन महिन्यांच्या काळात तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
26 जुलै रोजी दोन स्वयंसेवी संस्था 'एक्झोडस रोड इंडिया फाउंडेशन' आणि 'हार्मोनी फाउंडेशन' यांच्या मदतीने मीरा-भाईंदरच्या मानव तस्करी विरोधी पथकाने वसईजवळच्या नायगाव येथे संयुक्त कारवाई केली. नायगाव (पूर्व) येथील एका इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी 12 वर्षीय पीडित मुलगी आणि एका 20 वर्षीय महिलेची सुटका केली. याचवेळी, मोहम्मद खालिद बापरी, जुबेर शेख आणि शमीन सरदार या तीन बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली.
मानव तस्करीचा धक्कादायक प्रकार
हार्मोनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी परीक्षेत नापास झाल्याने घाबरून घरातून पळून गेली होती. त्यानंतर, तिच्याच गावातील 'मीम' नावाच्या एका महिलेने तिला नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून बेकायदेशीरपणे कोलकात्याला आणले. तिथे तिचे बनावट आधार कार्ड बनवून तिला विमानाने मुंबईत आणण्यात आले. नायगावमध्ये तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते.
संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, नायगावमध्ये पीडित मुलीला एका वृद्ध व्यक्तीसोबत इतर 7-8 मुलींसोबत ठेवले होते. दरम्यान, संबंधित वृद्धाने तिला ड्रग्जचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, तिला अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी अद्याप किशोरावस्थेत पोहोचलेली नाही, असं असतानाही नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडले.
हार्मोनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी सांगितले की, "पीडित मुलीला सुरुवातीला गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते. तीन महिन्यांच्या काळात 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले." या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीही मथाई यांनी केली आहे.