कधी घडली घटना?
ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास माहीम येथील हार्बर लाईन रेल्वे पटरी क्रमांक सहा जवळ घडली. जखमी तरुणांची नावे मल्लेश धनगर आणि व्यंकटेश राजू नायक अशी आहेत. व्यंकटेश हा माटुंगा परिसरातील लेबर कॅम्प, सिद्धार्थनगर येथे राहतो आणि तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याचा इरफान नावाच्या तरुणासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी इरफानने त्याला मारहाण केल्याने व्यंकटेशने शाहूनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.
advertisement
सोमवारी रात्री व्यंकटेश आणि त्याचा मित्र मल्लेश रेल्वे पटरीजवळ उभे असताना अभिषेक जाधव, बॉबी वाघ, कंट्या आणि चना या चौघांनी त्यांच्याशी जुन्या वादावरून भांडण सुरू केले. वाद वाढल्यावर मल्लेशच्या पोटात चाकूने वार करण्यात आला तर व्यंकटेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
दोघांनाही तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मल्लेशची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वडाळा रेल्वे पोलीस यांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
