वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका
नवी मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी घणसोली ते ऐरोली दरम्यान नवीन रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुमारे 550 कोटी रुपये खर्चून हा साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिकांचा रस्ता तयार केला जात आहे. या कामासाठी नवी मुंबई महानगर पालिका आणि सिडको समसमान निधी देत आहेत.
advertisement
कोणत्या भागांना होणार फायदा?
या नव्या मार्गामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील घणसोली महापे ते ठाणे आणि घणसोली महापे ते मुलुंड या मार्गांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल हे मार्ग खूप व्यस्त आहेत. नाशिक, मुंबई, मीरा-भाईंदर आणि गुजरातकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसा हलकी वाहने आणि रात्री जड वाहनांमुळे या रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असते.
याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आणि कार्गो सेवा वाढल्यानंतर वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नवीन पाम बीच रोड विस्तार आणि खाडीपूल प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या या प्रकल्पाचे फाउंडेशन आणि बोर पाइलिंगचे काम सुरू असून काही ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामही सुरू झाले आहे. हा पूल नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील चौथा खाडीपूल असणार आहे.
