मुंबई-पुणे प्रवास मोफत?
लोणावळ्यातील कार्ला गडावर आई एकविरा देवीचा वार्षिक यात्रोत्सव आजपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी होणार असून यांना एक दिलासा मिळणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग तीन दिवस टोल माफी जाहीर करण्यात आलेली आहे. हा निर्णय भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
advertisement
किती दिवस असणार टोल माफी?
कार्ला गडावरील एकविरा देवीची यात्रा ही आजपासून तीन दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशा तीन दिवस असणार आहे. या यात्रेनिमित्ताने ठाणे तसेच मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक त्यांच्या खाजगी वाहनांनी या ठिकाणी येत असतात. या दिवसांत टोलनाक्यांवर वाढती गर्दी आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी ही विशेष सवलत देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.
'या' डॉक्युमेंटची होणार तपासणी
खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील ही टोलमाफी सरसकट नसून त्यासाठी भाविकांना खासदार सुरेश म्हात्रे यांचे अधिकृत टोल माफीचे पत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. भाविकांनी टोल नाक्यावर हे पत्र दाखवल्यानंतरच त्यांना ही सवलत मिळणार आहे.
