अंधेरीतील गजबजलेलं लोखंडवाला असो की गोरेगावचं बांगुर नगर, गेल्या काही वेळापासून नागरिक अंधारात आहेत आणि ते सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. नक्की काय घडलंय आणि वीज कधी येणार? असा प्रश्न लोक उपस्थीत करत आहेत. अनेकांनी ट्वीटरवर विचारणा करायला देखील सुरुवात केली आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील (Western Suburbs) अनेक मोठ्या भागांतील वीज पुरवठा आज अचानक खंडीत झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड आणि अंधेरी पश्चिम (वर्सोवा, लोखंडवाला) या भागांचा समावेश आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड तासापासून (काही ठिकाणी तासाभरापासून) वीज गायब आहे. अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये संपूर्णपणे अंधार पसरला आहे. तसेच गोरेगावचे बांगुर नगर आणि मालाड पश्चिमेकडील अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अचानक वीज गेल्याने लिफ्टमध्ये लोक अडकल्याच्याही काही प्राथमिक तक्रारी समोर येत आहेत.
या संदर्भात नागरिकांनी ट्विटरवर (X) अडाणी इलेक्ट्रिसिटीला (Adani Electricity) टॅग करून प्रश्नांचा भडीमार सुरू केला. यावर कंपनीने अधिकृत उत्तर देत वीज जाण्याचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.
अडाणी इलेक्ट्रिसिटीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काही भागांत तांत्रिक बिघाडामुळे (Tripping Issue) वीज पुरवठा खंडीत झाला आहे. आमची टीम हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणि लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."
मुंबईत वीज जाणं ही तशी दुर्मिळ गोष्ट मानली जाते. त्यामुळे वीज जाताच मुंबईकरांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. "लोखंडवालामध्ये पूर्ण अंधार आहे", "मेट्रो प्रवासावर परिणाम झालाय का?", "दीड तास झाला तरी वीज का आली नाही?" अशा कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. वर्सोवा आणि जोगेश्वरीतील काही भागांतही कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
वीज कधी येणार?
अडाणी इलेक्ट्रिसिटीच्या इंजिनिअर्सची टीम सध्या फिल्डवर असून ट्रिपिंग झालेली सिस्टिम रिस्टोअर करण्याचं काम सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील 30 ते 45 मिनिटांत टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
