जेव्हा आपण 'हाय सिक्युरिटी' असा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे, सशस्त्र रक्षक आणि पोलादी दरवाजे येतात. सामान्य माणसासाठी या सुरक्षा भिंती भेदणे अशक्य असते. पण, याच भिंतींच्या आत जर एखाद्याचा जीव घेतला जात असेल, तर ती सुरक्षा आहे की मृत्यूचा सापळा? असा प्रश्न उभा रहातो.
अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय असलेला आणि बॉम्बसह पकडलेला दहशतवादी अब्दुल रहमान याची जेलमध्येच हत्या करण्यात आली आहे.
advertisement
जेलच्या ज्या कोठडीत साधी काडी मिळणेही मुश्कील असते, तिथे अब्दुल रहमानवर जीवघेणा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात ही घटना घडली. संशयित दहशतवादी अब्दुल रहमान याच्यावर धारधार शस्त्राने किंवा जड वस्तूने डोक्यावर वार करण्यात आले. या हल्ल्याचा आरोप जेलमधीलच दुसरा कैदी अरुण चौधरी याच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेने जेल प्रशासनाचे धाबे दणाणले आहे आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.
कोण होता हा अब्दुल रहमान? (राम मंदिर कनेक्शन)
2 मार्च रोजी गुजरात एटीएस (ATS) आणि फरिदाबाद पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेत अब्दुल रहमानला पाली गावातून बेड्या ठोकल्या होत्या. अवघ्या 19 वर्षांच्या या तरुणाकडे त्यावेळी दोन जिवंत बॉम्ब सापडले होते. सुरक्षा यंत्रणांच्या तपासात एक भयानक वास्तव समोर आले होते. अब्दुल रहमान अयोध्येतील राम मंदिरावर मोठा हल्ला करण्याची योजना आखत होता. त्याच्या अटकेमुळे एक मोठा घातपात टळला होता, पण आता जेलमध्येच त्याचा अंत झाला आहे.
अब्दुलची हत्या करणारा आरोपी अरुण चौधरी हा देखील साधा कैदी नाही. त्याला काही काळापूर्वीच जम्मू-काश्मीरमधून फरिदाबाद जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तो देखील हाय सिक्युरिटी बॅरेकमध्येच होता. या दोघांमध्ये नक्की काय बिनसले की ही टोकाची पायरी उचलली गेली? की या हत्येमागे काही मोठा कट आहे? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
एखाद्या संशयित दहशतवाद्याची, ज्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता होती, त्याची जेलमध्ये हत्या होणे हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे. शस्त्र आले कुठून?: हाय सिक्युरिटी झोनमध्ये धारधार वस्तू किंवा हल्ला करण्यासाठी लागणारे साहित्य पोहोचलेच कसे?
सुरक्षा रक्षक काय करत होते?: रात्रीच्या वेळी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा तैनात असलेले पोलीस काय झोपले होते का? अब्दुलचा आवाज कायमचा दाबण्यासाठी तर हा प्रयत्न नव्हता ना? असे अनेक प्रश्न उपस्थीत होतो.
सध्या फरिदाबाद पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जेल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून अरुण चौधरीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात जेलमधील इतर कोणाचा हात आहे का, याचाही कसून तपास केला जात आहे.
जेल ही गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी असते की त्यांच्या संघर्षाचा आखाडा बनत आहे, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
