पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगावर ऊर्जा संकट घोंगावत आहे. 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद झाल्याने जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना, भारताने शेजारील देश श्रीलंकेला मोठा दिलासा दिला आहे. भारताने तातडीची मदत म्हणून २०,००० मेट्रिक टन डिझेल आणि १८,००० मेट्रिक टन पेट्रोलचा पुरवठा श्रीलंकेला केला आहे.
advertisement
श्रीलंकेत इंधनाचा हाहाकार
श्रीलंकेत सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पेट्रोल ३९८ रुपये आणि डिझेल ३८२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधनाअभावी सरकारने आठवड्यातील कामाचे दिवस ४ दिवसांवर आणले असून 'वर्क फ्रॉम होम' सक्तीचे केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरवठादारांनी युद्धामुळे हात वर केले असताना, भारताने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOC) माध्यमातून ही 'संजीवनी' पाठवली आहे.
चीनकडून संकटकाळात धोका, भारत आला धावून...
विशेष म्हणजे, श्रीलंकेने हंबनटोटा बंदराजवळ तेल रिफायनरी उभारण्यासाठी चीनच्या 'सिनोपेक' कंपनीसोबत ३.७ अब्ज डॉलर्सचा करार केला होता. मात्र, प्रत्यक्ष संकटाच्या वेळी चीनने कोणतीही मदत केली नाही. श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा यांनी भारताचे आभार मानताना अप्रत्यक्षपणे चीनवर टीका केली. "संकट काळात जो धावून येतो तोच खरा मित्र," अशा शब्दांत त्यांनी भारताचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनूरा कुमार दिसानायके यांच्यातील चर्चेनंतर भारताने हा तातडीचा निर्णय घेतला. जगातील बलाढ्य देश स्वतःचा विचार करत आहेत, तेव्हा भारताने 'नेबरहुड फर्स्ट' धोरण राबवत श्रीलंकेला अंधारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
