जसा डेटा स्वस्त केला, तसंच AI साठी खास प्लॅन
काही वर्षांपूर्वी जिओने ज्याप्रमाणे इंटरनेटचे दर सामान्यांच्या आवाक्यात आणले, अगदी तसंच आता एआय तंत्रज्ञानही स्वस्त दरात प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा रिलायन्सचा मानस आहे. अंबानी म्हणाले की, "भारत आपली बुद्धिमत्ता भाड्याने घेणार नाही. इंटरनेटच्या युगातून आता आपण 'इंटेलिजन्स' युगात प्रवेश करतोय आणि पुढील ७ वर्षांत रिलायन्स यासाठी मोठी गुंतवणूक करेल."
advertisement
तुमच्या-आमच्या भाषेत एआय बोलणार
एआय म्हणजे फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी आहे, हा समज आता मोडीत निघणार आहे. जिओचं एआय तंत्रज्ञान आता मराठीसह सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी खास सुविधा दिल्या जातील, यामुळे गावातला शेतकरी असो वा शहरातला दुकानदार, प्रत्येकजण आपल्या भाषेत या तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल.
तीन महत्त्वाचे घटक
शेतकऱ्यांसाठी: 'जिओ कृषी एआय'द्वारे शेतीबद्दल सल्ला मिळेल.
रुग्णांसाठी: 'जिओ आरोग्य एआय'च्या मदतीने आरोग्याची माहिती मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी: शिक्षणासाठी 'जिओ शिक्षा एआय' मदतीला असेल.
नोकरी जाईल की राहील? अंबानींनी दिली खात्री
अनेक लोकांच्या मनात भीती आहे की एआयमुळे नोकऱ्या जातील. यावर उत्तर देताना अंबानी म्हणाले, "एआय नोकऱ्या हिरावून घेणार नाही, उलट ते माणसाचं काम सोपं आणि वेगवान करेल. हे एक असं 'अक्षय पात्र' आहे जे संपणार नाही, उलट प्रगतीच्या नवीन संधी निर्माण करेल."
जामनगरमध्ये उभं राहतंय जगाचं लक्ष असणारं केंद्र
हे सर्व करण्यासाठी मोठ्या 'डेटा सेंटर'ची गरज लागते. रिलायन्स आता जामनगरमध्ये एक अवाढव्य डेटा सेंटर पार्क उभारत आहे. विशेष म्हणजे हे केंद्र पूर्णपणे निसर्गाला पूरक अशा 'ग्रीन एनर्जी'वर चालेल. २०२६ च्या शेवटी हे काम पूर्ण होईल आणि तिथून संपूर्ण देशातील शाळा, रुग्णालय आणि घराघरात स्वस्त एआय पोहोचवलं जाईल. येत्या काळात भारत जगाची 'एआय पॉवर' बनणार आहे. मुकेश अंबानींच्या या १० लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे भारताच्या आर्थिक प्रगतीला नवा वेग मिळणार, हे नक्की!
