होळी आणि धुळवडीचा सण वाईट विचारांना, वादांना पूर्णविराम देण्याचा असतो, मात्र समाजातील वाईट प्रवृत्ती सहजासहजी संपवणं शक्य नाही. होळीच्या दिवशीच उत्तर प्रदेशात एका व्यक्तीची जमावाकडून हत्या झाली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये होळी खेळण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीला काही जणांनी मारहाण केली व त्यात त्याचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले व त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला.
advertisement
पूर्ववैमनस्यातून हल्ला
शेरकोट पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या हरेवली गावात ही घटना घडली. तिथे राहणारे राजकुमार (45) शेजाऱ्यांसोबत होळी खेळण्यासाठी जात होते. त्यादरम्यान गावात राहणाऱ्या इतर काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. राजकुमार यांच्या कुटुंबाचं गावात राहणाऱ्या राजेंद्र यांच्याशी वैर होतं. त्यातूनच हा हल्ला झाला व त्यात राजकुमार यांचा मृत्यू झाला. राजेंद्र, त्यांची मुलं, जावई व कुटुंबातील इतर एका सदस्याने मिळून राजकुमार यांना घेरून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना मारलं, असा आरोप राजकुमार यांच्या नातेवाईकांनी केलाय. राजकुमार यांनी तिथून पळून जाऊन जीव वाचवायचा प्रयत्नही केला, मात्र काही अंतरावर गेल्यावरच ते खाली पडले व त्यांचा मृत्यू झाला.
वाचा - दिवसा समाजसेवा रात्री दरोडा! 5 कोटींच्या दरोड्यातील आरोपीला पाहून पोलिसांना बसला धक्का
हत्येबाबत गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच अफझलगड येथील सीओ अर्चना सिंह, शेरकोट येथील एसओ धीरज नागर पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. राजकुमार यांचे भाऊ सुरेंद्र यांनी राजेंद्र, त्यांची मुलं किशन, संजय, रोहित, जावई अर्जुन आणि रामगोपाल यांच्याविरुद्ध शेरकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी गुन्ह दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानुसार आता पुढील कारवाई पोलीस करतील.
या घटनेमुळे परिसरात शांतता परसली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असला, तरी अजूनपर्यंत यात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.