भारतामध्ये जगातील सर्वात मोठा AI Impact Summit झाला. 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये उपस्थित होते. अशा प्रकारचा जागतिक दर्जाचा कार्यक्रम कोणत्याही विकसनशील देशात यापूर्वी झाला नव्हता, असे मोदी म्हणाले.
मात्र, काँग्रेसने या जागतिक कार्यक्रमाला “गलिच्छ आणि नग्न राजकारणाचे व्यासपीठ” बनवले, असा आरोप त्यांनी केला. देशाला माहीत आहे की तुम्ही आधीच राजकीयदृष्ट्या उघडे पडले आहात, मग कपडे काढण्याची गरज काय होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
काँग्रेस वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर
पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, या घटनेतून काँग्रेस किती वैचारिकदृष्ट्या कमकुवत झाली आहे, हे दिसते. काँग्रेस नेत्यांना मोदींचा द्वेष आहे. ते माझ्यावर टीका करतात, माझ्या कुटुंबालाही लक्ष्य करतात. भाजप किंवा एनडीएला विरोध करणे समजू शकते, पण AI ग्लोबल समिट हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता, तो देशाचा कार्यक्रम होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही टीका करण्याचे धैर्य दाखवले, याबद्दल समाधान व्यक्त करत मोदींनी काँग्रेस देशावर ओझे बनल्याचा आरोप केला.
काय घडलं होतं AI समिटमध्ये?
दोन दिवसांपूर्वी भारत मंडपम येथे सुरू असलेल्या AI Impact Summit दरम्यान युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घोषणाबाजी केली. “Compromised PM” आणि “Pax Silica” अशी घोषवाक्ये देत ते सभागृहात फिरताना दिसले. पोलिसांनी सुमारे 10 आंदोलकांना ताब्यात घेत तिलक मार्ग पोलिस ठाण्यात नेले. हे आंदोलन काही मिनिटांत आटोपले, मात्र आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित असताना झालेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त झाले.
सहयोगी पक्षांकडूनही टीका
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. “परदेशी प्रतिनिधी उपस्थित असताना गोंधळ घालणे चुकीचे आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा दुखावते,” असे ते म्हणाले. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी या घटनेला “लाजिरवाणी आणि निषेधार्ह” म्हटले. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही युवक काँग्रेसच्या कृतीमुळे “सर्वांना लाज वाटली” अशी प्रतिक्रिया दिली.
राजकीय वातावरण तापले
AI Impact Summit सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर घडलेल्या या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे भाजपने काँग्रेसवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसकडूनही या आंदोलनामागील कारणांबाबत भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.
