याच आठवड्यात पक्षाने राज्यसभेतून त्यांना उपनेतेपदावरून हटवले असून AAP च्या कोट्यातून त्यांना सभागृहात बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असेही निर्देश दिले आहेत. मात्र या कारवाईनंतरही 37 वर्षीय चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून आपले मत मांडणे सुरूच ठेवले आहे.
चड्ढा यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की कालपासून माझ्याविरुद्ध एक ठरवून राबवलेली मोहीम सुरू आहे. त्यात एकसारखी भाषा, समान मुद्दे आणि तेच आरोप वारंवार मांडले जात आहेत. हे योगायोग नसून एक समन्वयित हल्ला आहे. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष करावे असे वाटले, पण एखादा खोटा आरोप शंभर वेळा सांगितला तर तो खरा वाटू लागतो, म्हणून मी उत्तर देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
त्यांनी स्पष्ट केले की हे आरोप त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडूनच करण्यात आले आहेत.
पहिला आरोप
AAP ने आरोप केला की विरोधक जेव्हा संसदेत वॉकआउट करतात तेव्हा राघव चड्ढा सभागृहातच बसून राहतात आणि त्यांच्यात सामील होत नाहीत. यावर चड्ढा यांनी ठामपणे प्रतिक्रिया देत हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले.
मी आव्हान देतो की एक तरी उदाहरण दाखवा जेव्हा विरोधकांनी वॉकआउट केले आणि मी त्यांच्यासोबत उभा राहिलो नाही. संसदेत सर्वत्र CCTV कॅमेरे आहेत फुटेज तपासा आणि सत्य समोर आणा, असे त्यांनी सांगितले.
दुसरा आरोप
दुसरा आरोप असा आहे की, त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या महाभियोग प्रस्तावावर सही करण्यास नकार दिला. यालाही त्यांनी खोटे ठरवत म्हटले की, पक्षातील कोणत्याही नेत्याने मला हा प्रस्ताव साइन करण्यास सांगितलेच नाही. AAP चे राज्यसभेत 10 खासदार आहेत, त्यापैकी 6-7 जणांनी स्वतःही सही केलेली नाही, मग फक्त माझ्यावरच दोष का?
त्यांनी पुढे सांगितले की या प्रस्तावासाठी 50 स्वाक्षऱ्यांची आवश्यकता असते आणि विरोधकांकडे एकूण 105 खासदार आहेत. त्यामुळे हा मुद्दा इतका मोठा करण्याचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मार्च महिन्यात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग प्रमुखांवर सत्ताधारी पक्षाला मदत केल्याचा आरोप केला होता. विशेषतः मतदार यादीतील विशेष पुनरावलोकन प्रक्रियेबाबत (SIR) त्यांनी आक्षेप घेतला होता.
तिसरा आरोप
तिसरा आरोप असा आहे की चड्ढा घाबरले आहेत आणि त्यामुळे ते किरकोळ मुद्दे मांडतात. AAP दिल्लीचे प्रमुख सौरभ भारद्वाज यांनी त्यांच्यावर टीका करत म्हटले की, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहोत आणि ‘जो डर गया समझो मर गया’ हेच आम्ही शिकलो आहोत. छोट्या पक्षाला संसदेत मर्यादित वेळ मिळतो. त्यामुळे देशाचे मोठे मुद्दे मांडणे अधिक महत्त्वाचे आहे.
चड्ढा यांचे उत्तर
मी संसदेत गोंधळ घालण्यासाठी, आरडाओरडा करण्यासाठी किंवा माईक तोडण्यासाठी जात नाही. मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांच्या वतीने बोलण्यासाठी संसदेत जातो. GST, आयकर, पंजाबमधील पाणीटंचाई, दिल्लीतील हवेची गुणवत्ता, सरकारी शाळांची स्थिती, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या, तसेच मासिक पाळी आरोग्यासारख्या विषयांवरही चर्चा केली आहे. बेरोजगारीपासून महागाईपर्यंत सर्व महत्त्वाचे मुद्दे संसदेत उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला.
चड्ढा यांनी नागरिकांना गेल्या चार वर्षांतील त्यांचा संसदीय कामगिरीचा आढावा घेण्याचे आवाहन केले. मी संसदेत प्रभाव निर्माण करण्यासाठी गेलो आहे, गोंधळ घालण्यासाठी नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आपल्या वक्तव्याचा शेवट करताना त्यांनी इशारा दिला की माझ्याविरुद्ध करण्यात येणारे प्रत्येक खोटे आरोप उघड केले जातील आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. कारण मी जखमी आहे आणि त्यामुळेच अधिक घातक आहे, असे म्हणत त्यांनी ‘जय हिंद’ने आपला संदेश समाप्त केला.
