2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 215 जागा जिंकत सत्ता कायम राखली होती तर भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले होते. जरी भाजपला सत्तांतर घडवता आले नाही तरी त्या निवडणुकीत पक्षाने मोठी झेप घेतली होती.
ताज्या अंदाजानुसार यावेळी निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता असून भाजपच्या कामगिरीत लक्षणीय वाढ आणि टीएमसीच्या मतांमध्ये घट दिसून येऊ शकते.
advertisement
कोणाला किती टक्के मते?
VoteVibe सर्वेक्षणानुसार टीएमसीचा मतांचा वाटा 43.7% तर भाजपचा 39.7% असा राहण्याचा अंदाज आहे. 2021 मध्ये टीएमसीला 48.02% मते मिळाली होती तर भाजपला 38.15% मते मिळाली होती. विशेष म्हणजे भाजपच्या मतांमध्ये केवळ किरकोळ वाढ असूनही जागांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे, याचा अर्थ मतांचे जागांमध्ये रूपांतर अधिक प्रभावी होत असल्याचे दिसते. उलट टीएमसीच्या मतांबरोबरच जागांमध्येही घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मतदारांच्या मनातील मुद्दे काय?
या सर्वेक्षणानुसार पुढील मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांना 44.4% मतदारांची पसंती आहे. त्यानंतर भाजपचे सुवेंदू अधिकारी यांना 38.3% लोकांनी पसंती दिली आहे.
राज्यातील प्रमुख मुद्द्यांमध्ये बेरोजगारी आणि विकासाचा अभाव हा सर्वात मोठा मुद्दा ठरला असून 36.6% मतदारांनी याला प्रमुख चिंता म्हणून नमूद केले आहे. त्यानंतर कायदा-सुव्यवस्था व महिला सुरक्षा (17.6%), महागाई (10.3%) आणि भ्रष्टाचार (10.1%) हे मुद्दे महत्त्वाचे मानले गेले आहेत.
सर्वेक्षणात असेही आढळले की सुमारे 46.5% मतदारांच्या मते AIMIM च्या प्रवेशामुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडू शकते. तर केवळ 21.1% लोकांना वाटते की याचा फायदा टीएमसीला होईल.
तसेच सुमारे 41% लोकांनी टीएमसी सरकारच्या कामगिरीला “खराब” किंवा “अतिशय खराब” असे मूल्यांकन दिले असून राज्यात काही प्रमाणात सत्ताविरोधी लाट असल्याचे संकेत मिळतात. पश्चिम बंगालमध्ये मतदान 23 एप्रिल आणि 29 एप्रिल या दोन टप्प्यांत होणार आहे तर मतमोजणी 4 मे रोजी केली जाणार आहे.
राज्यात कोणाची सत्ता?
6 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या VoteVibe च्या Vote Tracker सर्वेक्षणानुसार 294 सदस्यीय विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला 159 ते 169 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर भाजपला 120 ते 130 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे.
हा VoteVibe चा तिसरा ओपिनियन पोल आहे. याआधीच्या दोन्ही सर्वेक्षणांमध्येही टीएमसीला विजय मिळेल असे भाकीत करण्यात आले होते. मात्र त्या वेळी जागांचा आकडा अधिक होता.
23 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या सर्वेक्षणात टीएमसीला 184 ते 194 जागा, तर भाजपला 98 ते 108 जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर 30 मार्चच्या सर्वेक्षणात टीएमसीला 169 ते 179 आणि भाजपला 113 ते 123 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता ताज्या सर्वेक्षणात टीएमसीच्या जागांमध्ये घट दाखवण्यात आली असून भाजपच्या जागांमध्ये वाढ दर्शवण्यात आली आहे.
