झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरिया भागात क्रॅश झालेल्या एअर अॅम्ब्युलन्समध्ये कोण होते, याची माहिती समोर आली आहे. कॅप्टन विवेक विकास भगत आणि कॅप्टन सवराजदीप सिंह होते. याशिवाय रुग्ण संजय कुमार, त्यांच्यासोबत अटेंडंट म्हणून अर्चना देवी आणि धुरु कुमार होते. तसंच एअर अॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर विकास कुमार गुप्ता आणि पॅरामेडिक सचिव कुमार मिश्रा होते.र
advertisement
रुग्णाची माहिती समोर
देवकमल हॉस्पिटलचे डॉक्टर अनंत सिन्हा यांनी सांगितलं की, रुग्ण संजय कुमार खूप जळाले होते. देवकमल हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचार घेत होते. रुग्णाचे नाव संजय कुमार आहे. सुमारे 65% जळाले होते. सोमवारीपासून 6-7 दिवस आधी ते आमच्याकडे ऍडमिट होते. ते बिहारच्या चांदवाला येथील होते. अशा प्रकरणामध्ये फार आशा बाळगली जात नाही. पण,कुटुंबीयांनी एअर अॅम्ब्युलन्सने आम्ही दिल्लीला नेत आहोत, असं ठरवलं. आमच्याकडून पेशंट सुमारे 2 वाजता एअरपोर्टसाठी रवाना झाला होता. रांचीच्या देवकम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये 41 वर्षीय संजय कुमार यांना गंभीर जळाल्यामुळे उपचारानंतर उच्च केंद्रात रेफर करण्यात आलं होतं. हॉस्पिटलने दिलेल्या डिस्चार्ज समरीनुसार, रुग्ण 16 फेब्रुवारी 2026 रोजी पेट्रोलियम पदार्थामुळे लागलेल्या आगीत 63% जळाल्यानंतर रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं.
कुठून कुठे चाललं होतं विमान?
हे एक खासगी विमान होतं. Beechcraft King Air C90 विमान असून ते VT-AJV असं होतं. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळासाठी रवाना झालं होतं. विमानाने रांचीहून संध्याकाळी 7.11 वाजेच्या सुमारास टेकऑफ केलं होतं. पण अवघ्या २० मिनिटांमध्ये विमानाचा संपर्क तुटला. संध्याकाळी 7:34 च्या सुमारास अटाली नावाच्या भागाजवळ विमानाचा संपर्क तुटला. शेवटचा संपर्क VEC कंट्रोलवर झाला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी विमानाचा कोणताही संपर्क झाला नाही.
रात्री 8:05 वाजेच्या सुमारास रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटराला अलर्ट करण्यात आलं. लगेच शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. पण काही वेळातच झारखंडची राजधानी रांचीच्या जंगलात हे विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली.
