बारामती: बारामती शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. दारूची पार्टी करत असलेल्या तीन मित्रांमध्ये काहीतरी वाद झाला. यानंतर किरकोळ वादातून एका २० वर्षीय तरुणाला त्याच्याच दोन मित्रांनी दगडाने ठेचून ठार केलं. हा धक्कादायक प्रकार रविवारी ( १४ डिसेंबर) रात्री जुना बारामती-मोरगाव रस्त्यावर घडला. या घटनेची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे, खून केल्यानंतर दोन्ही आरोपी मित्र स्वतःहून पोलीस ठाण्यात गेले. ते बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी पोलिसांना "साहेब, आम्ही अविनाशची हत्या केली आहे," अशी कबुली दिली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०, रा. बारामती) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अविनाश लोंढे, समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे इस्टेट, बारामती) आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगताप मळा, बारामती) हे तिघे मित्र रविवारी रात्रीच्या वेळी जुना बारामती-मोरगाव रस्त्यावर एकत्र बसून दारू पीत होते.
'माहेरी निघून जा, नाहीतर...', पुण्यातील नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची धमकी, बायकोची पोलिसात धाव
दारूच्या नशेत असताना त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी समीर शेख आणि प्रथमेश दळवी या दोघांनी अविनाश लोंढे याला दगडानं जबर मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर समीर शेख आणि प्रथमेश दळवी यांनी थेट बारामती शहर पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देत आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तातडीनं ताब्यात घेतलं आहे. घटनेत मित्रांकडूनच मित्राचा खून झाल्यामुळे बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खुनामागचं नेमके कारण काय होतं, याचा शोध घेत आहेत.
