नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी मल्लिकार्जुन आंबेगावे हे आपल्या कुटुंबासह नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून आपल्या घराकडे परतत असताना, मंचर परिसरात त्यांचा कारवरील ताबा सुटला. यावेळी कार दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेला गेली आणि पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या एका खासगी बसला तिने जोरदार धडक दिली.
advertisement
ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ती बसच्या खालच्या बाजूला घुसली होती. या भीषण अपघातात कारमधील मल्लिकार्जुन आंबेगावे, त्यांच्या पत्नी आरती आंबेगावे आणि आई लता तूपलोंढे यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला
काळाने घाला घातलेल्या या घटनेत सुदैवाने मल्लिकार्जुन यांची मुलगा आणि मुलगी बचावले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, धडक बसलेल्या खासगी बसमधील काही प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांचा संताप आणि महामार्गाचा प्रश्न
या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महामार्गाच्या कामातील त्रुटींमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "महामार्गाची रचना सदोष आहे आणि सुधारणांची कामे अजूनही प्रलंबित आहेत. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहेत," अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.
