प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व: खंबाटकी घाटातील जुना रस्ता तीव्र वळणांचा आणि चढणीचा असल्याने तेथे अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडी होत असे. ४० ते ४५ मिनिटांचा हा प्रवास सुलभ करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा नवीन ६.५ किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात आधुनिक बोगदा, १ किमी लांबीचा दरीपूल (वायडक्ट) आणि दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे.
advertisement
प्रवासातील मोठे बदल:
वेळेची बचत: घाटातील ४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या ७ मिनिटांवर येणार आहे.
वाहतूक क्षमता: पुढील २५ वर्षांचा विचार करून साकारलेल्या या मार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावू शकतील.
सुरक्षितता: घाटातील जीवघेणी 'एस' वळणे आता टळणार असून अपघातप्रवण क्षेत्र कमी होतील.
आधुनिक सुविधा: बोगद्यात प्रकाश व्यवस्था, हवा खेळती राहण्यासाठी पंखे आणि आपत्कालीन मदतीसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
सध्या सातारा ते पुणे दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी एक बोगदा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या बोगद्याचे आणि दरीपुलाचे किरकोळ काम शिल्लक असून, जून २०२६ पर्यंत दोन्ही बोगद्यांतून सहा पदरी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
