उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक १ आणि १२ मधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या गेल्या पाच वर्षांतील कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
"आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपने आपल्या कार्यकाळात कर्जबाजारी केली, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला. शहरातील प्रशासकीय राजवटीत घेतलेले चुकीचे निर्णय आणि गलथान कारभारामुळे शहराचे नुकसान झाले आहे. कुदळवाडी परिसरातील ३०० एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले, यावरून संताप व्यक्त करत कुठे फेडाल हे पाप? असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना विचारला.
advertisement
'आळशी लोकांकडे लक्ष देऊ नका'
निवडणुकीच्या पहिल्याच सभेत अजित पवारांनी मतदारांना भावनिक साद घातली. "मी कामाचा माणूस आहे. मी सकाळी ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. जेव्हा मी काम करत असतो, तेव्हा काही आळशी लोक झोपलेले असतात. अशा लोकांकडे लक्ष देऊ नका", असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, या सभेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पाहायला मिळणार असून, अजित पवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.
