नेमकी घटना काय?
मृत तरुणी ही बाणेर येथील एका नातेवाईकाकडे राहत होती. २७ जानेवारी रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाला. परिसरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांचा आरोप आहे की, या मुलींना संबंधित नातेवाईकाकडे अमानुष कामाचा ताण, मानसिक छळ आणि निर्दयी वागणूक सहन करावी लागत होती. जर मोठ्या बहिणीच्या मृत्यूच्या वेळी योग्य तपास झाला असता, तर आज लहान बहिणीचा जीव वाचला असता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
advertisement
पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा
या घटनेला १० पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांच्या भूमिकेवर आणि तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका जागरूक नागरिकाने कायदेशीर प्रक्रियेची विचारणा केली असता त्याला 'झापण्यात' आल्याचीही चर्चा आहे, ज्यामुळे संशय अधिक बळावला आहे.
शांततामय मोर्चा आणि श्रद्धांजली
रविवारी सायंकाळी ५ वाजता बाणेर-बालेवाडी रोडवर नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. मृत तरुणीला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हातात फलक घेऊन बाणेर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. "आम्ही कोणाच्याही द्वेषासाठी नाही, तर न्यायासाठी एकत्र आलो आहोत. निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होऊन सत्य समोर यावे," अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
