सेवा रद्द करण्याचे कारण काय?
इंडिगोने या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. कंपनीने केवळ 'कामकाजातील बदल' असे उत्तर दिले आहे. मात्र, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नव्हता. सततच्या कमी प्रतिसादामुळे ही सेवा चालवणे कंपनीला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांनी या सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
advertisement
प्रवाशांना बसणार दुहेरी फटका
पर्यायांचा अभाव: आता पुण्याहून बँकॉकला जाण्यासाठी केवळ 'एअर इंडिया एक्सप्रेस' ही एकच कंपनी उपलब्ध असेल. त्यामुळे, या मार्गावर एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र चालू सेवा बंद पडणे हे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी चिंताजनक आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितलं की, "विमान कंपन्या प्रत्येक हंगामात प्रवाशांच्या प्रतिसादाचा आढावा घेतात. जर एखाद्या मार्गावर पुरेसे प्रवासी मिळत नसतील, तर व्यावसायिक कारणास्तव सेवा रद्द केली जाते. कदाचित ही कंपनी आता दुसऱ्या फायदेशीर मार्गावर आपली विमाने वळवेल."
सध्या पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी आणि बँकॉक या तीनच आंतरराष्ट्रीय शहरांसाठी सेवा उपलब्ध आहे. इंडिगोच्या या निर्णयामुळे पर्यटनासाठी बँकॉकला जाणाऱ्या पुणेकरांच्या खिशाला आता मोठी कात्री लागण्याची चिन्हे आहेत.
