आदित्यवर कोयत्याने सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सुनील कांबळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. लाकूड तोडण्यासाठी जसे घाव घातले जातात, तशाच क्रूर पद्धतीने आरोपी आदित्यवर कोयत्याने वार करत होते. तो तरुण जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांच्या पाया पडत होता, गयावया करत होता, मात्र हल्लेखोरांनी त्यावर कोणतीही दया दाखवली नाही. सध्या आदित्यवर हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
advertisement
डोक्यावर 30 पेक्षा जास्त टाके, प्रकृती चिंताजनक
या हल्ल्याचे मुख्य कारण अत्यंत धक्कादायक आहे. आरोपीच्या विरोधात एका मैत्रिणीला तक्रार देण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरून हा खुनी हल्ला करण्यात आला. मारहाणीदरम्यान आदित्यच्या डोक्यावर 30 पेक्षा जास्त टाके पडले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला सुरू होता, तेव्हा घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती, मात्र कोणामध्येही त्या तरुणाला वाचवण्याचे धाडस दिसले नाही.
कुटूंबियांची संतप्त प्रतिक्रिया
या प्रकरणावरून आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप होत आहेत. एवढा भीषण हल्ला होऊनही भारती विद्यापीठ पोलिसांनी अद्याप 'खुनाचा प्रयत्न' केल्याचं कलम लावलेले नाही. केवळ इच्छापूर्वक हत्याराने जबर दुखापत केल्याचे कलम लावून पोलिसांनी गुन्हेगारांना एक प्रकारे सूट दिल्याची भावना आदित्यच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
दरम्यान, पुण्यातील कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. भररस्त्यात सीसीटीव्ही समोर अशा घटना घडत असतील, तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
