नेमकी घटना काय?
तक्रारदार महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे २०२३ मध्ये सोनोग्राफी अहवालात समोर आले होते. उपचारासाठी त्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील साई केअर हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांना लेझर शस्त्रक्रियेद्वारे केवळ गाठ काढावी लागेल, असे आश्वासन दिले होते. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि १७ सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले.
advertisement
तपासणीत धक्कादायक वास्तव उघड
शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागला. त्या पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या असता, डॉक्टरांनी गाठ काढण्याऐवजी संपूर्ण गर्भाशयच काढून टाकल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी महिलेने केवळ गाठ काढण्याची परवानगी दिली होती, गर्भाशय काढण्याबाबत कोणतीही संमती (Consent) दिलेली नव्हती. याबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता, त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
पाच जणांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी पीडितेने मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
