नेमकं काय घडलं?
कात्रज इथले रहिवासी असलेले शुभम सचिन अजेटराव आणि अमित सचिन अजेटराव हे दोघे मित्र रात्री उशिरा वेल्हे भागातून पाबे खिंडीमार्गे पुण्याकडे निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास घाट चढत असताना एका धोकादायक वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. क्षणात कार रस्त्यावरून घसरली आणि थेट दरीच्या दिशेने झेपावली. कार दरीत कोसळताना झालेल्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.
advertisement
पोलिसांनी केलं रेस्क्यू
अपघाताची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आकाश पाटील यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण केले. मध्यरात्रीची वेळ आणि खोल दरी असल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. मात्र, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जीवाची पर्वा न करता दरीत उतरून जखमींना शोधले. दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाली होती, त्यांना स्ट्रेचरच्या साहाय्याने मोठ्या कष्टाने दरीतून बाहेर काढण्यात आले.
मृत्यूच्या दाढेतून सुटका
सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी शुभम आणि अमित यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, दोन्ही तरुणांना वाचवण्यात यश आलं आहे. पाबे घाटातील ही धोकादायक वळणे रात्रीच्या वेळी चालकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. त्यामुळे या घाटातून प्रवास करताना प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
