ताम्हिणी घाटाचा पर्याय ठरणार गेमचेंजर
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर म्हणजेच श्रीवर्धन येथे सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. भविष्यात हेच बंदर व्यावसायिक आणि लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. सध्या पुण्याशी जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे ताम्हिणी घाट. मात्र अंतर कमी करण्यासाठी दोन पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. हे मार्ग तयार झाल्यास दिघी-पुणे अंतर 30 ते 50 किमीने कमी होईल. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
advertisement
कसा असेल मार्ग?
पहिला पर्याय तर मुळशी-वाघेवाडी-ताम्हिणी दरम्यान पूल आणि बोगदा उभारण्याचा आहे तर दुसरा पर्याय म्हणजे माणगाव-कुंभे-घोळ-पानशेत-पुणे असा असणार आहे. माणगाव ते कुंभेपर्यंत रस्ता तयार आहे,मात्र घोळपर्यंत सुमारे सात किमी रस्ता अपूर्ण आहे. या मार्गातील काही भाग रायगड तर काही पुणे जिल्ह्यात येतो. दोन्ही जिल्ह्यांतील एकमत होत नसल्याने काम रखडले आहे.
कोकण-पश्चिम-उत्तर महाराष्ट्राला फायदा
महत्त्वाचे म्हणजे दिघी बंदरामुळे कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील व्यापार वाढणार आहे तसेच पर्यटनालाही चालना मिळेल. सध्या सुट्टीच्या दिवशी ताम्हिणी घाटात वाहतूककोंडी होते. पर्यायी मार्ग तयार झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल आणि दक्षिण कोकणाकडे जाणे अधिक सोपे होईल. त्यामुळे या रस्ते प्रकल्पाला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
