पुणे - राज्यामध्ये परतीच्या मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याच लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
मुंबईसह उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मुंबईमध्ये उकाडा कायम जाणवेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत उद्या 27 अंश सेल्सिअस कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुण्यात उद्या 28 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये उद्या 30 अंश सेल्सियस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठवाड्याचा विचार केला असता याठिकाणी बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 28 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा पावसाचं आगमन झाले असून काही भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.