या प्रणालीला आयटीएमएस (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) असे नाव देण्यात आले आहे. या प्रणालीतून महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना सीसीटीव्हीद्वारे ओळखले जाईल आणि लगेचच त्यांना दंड आकारला जाईल. त्यामुळे नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई होईल. येत्या वर्षभरात ही संपूर्ण प्रणाली राज्यभर कार्यान्वित होईल.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, तसेच मुंबई तसेच नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरही ही प्रणाली लावण्यात आली आहे. पुणे द्रुतगती मार्गावरील आयटीएमएसच्या माध्यमातून लावलेल्या सीसीटीव्हींच्या मदतीने अपघातांची संख्या आधीच कमी झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात अपघातांमुळे मृत्यूदर वाढत असल्याने हा प्रकल्प अत्यंत गरजेचा ठरला आहे. 2021 मध्ये राज्यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या 13,528 होती, तर 2023 मध्ये ही संख्या 15 हजारापेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे 2030 पर्यंत अपघात आणि त्यातील मृत्यूदर निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य परिवहन विभागाने ठेवले आहे.
advertisement
25 हजार कि.मी. मार्ग 'नजरेत' येणार
आयटीएमएस प्रणालीची उभारणी पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर तीन कंपन्यांना सोपवण्यात आली आहे. या कामासाठी 1 हजार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला गेला असून, प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 20 किलोमीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही लावले जातील, ज्यामुळे अंदाजे 25 हजार कि.मी.चा मार्ग सतत लक्षात राहील. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना लगेच दंडाची नोटीस दिली जाईल आणि आवश्यक असल्यास अटकही केली जाईल.
हा प्रकल्प केवळ अपघात कमी करण्यापुरता मर्यादित नाही, तर रस्त्यावर वाहनचालकांचे अनुशासनही वाढवेल. नागरिकांना सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय रस्ते सुरक्षा आणि प्रवासी संरक्षणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे.