हिंदू मान्यतेनुसार, नागाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दोष, भीती दूर होऊन सुख व सौभाग्य मिळते. नागपंचमीला नागाला दूध अर्पण करणाऱ्या व्यक्तीला भविष्यात सर्पदंशाची भीती राहत नाही. नाग पूजा करणाऱ्यांची सर्व संकटं दूर करून त्यांना सुख प्रदान करतात, असं म्हणतात.
पौराणिक कथा
नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. त्यानुसार, महाभारतातील अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित याचा तक्षक नावाच्या सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा पुत्र जन्मेजयाने पृथ्वीवरील सर्व सापांना नष्ट करण्यासाठी यज्ञ केला, त्यामुळे जगभरातील सर्व सर्प त्या यज्ञकुंडाच्या आगीत पडू लागले. यामुळे तक्षक नाग घाबरून भगवान इंद्राच्या सिंहासनात लपला. मग यज्ञाच्या प्रभावामुळे तक्षक नागासह भगवान इंद्राचं सिंहासन हवनकुंडाकडे ओढलं जाऊ लागलं.
advertisement
हे पाहून देव व ऋषींनी जन्मेजयाला यज्ञ थांबवण्यास सांगितलं. या यज्ञामुळे सर्व साप नष्ट झाल्यास निसर्गाचा समतोल बिघडेल, असं देवांचं म्हणणं होतं. यानंतर राजा जन्मेजयाने तक्षक नागाला माफ करून यज्ञ समाप्त केला. यज्ञ संपल्यानंतर भाजलेल्या सापांची जळजळ दूर व्हावी, यासाठी त्यांना दुधाने स्नान घालण्यात आलं. हा दिवस नागपंचमीचा दिवस होता. त्यानंतर नागदेवाला दुधाने स्नान घालण्याची परंपरा सुरू आहे.
नागांच्या कथेशी संबंधित भविष्य पुराणात म्हटलंय की आठ प्रमुख सापांची नावं घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. या संबंधी श्लोक -
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनंजयौ ॥
एतेऽभयं प्रयच्छन्ति प्राणिनां प्राणजीविनाम् ॥ (भविष्योत्तरपुराण ३२-२-७)
अर्थ: वासुकि, तक्षक, कालिया, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय – हे नाग प्राण्यांना निर्भयता प्रदान करतात.
सापांना खरंच दूध पाजतात का?
नागपंचमीला लोक नागाला दूध पाजतात, पण साप दूध पित नाही किंवा त्यांना दूध पाजण्याची परंपराही नाही. हिंदू मान्यतेनुसार नागपंचमीला विविध प्रकारच्या सापांना दुधाने आंघोळ घालण्याची परंपरा आहे, त्यांना दूध पाजण्याची नाही. यामुळेच नागदेवतेच्या पूजेमध्ये दुधाचा अभिषेक केला जातो.
