घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी?
तुम्ही ब्राह्मणाशिवाय देखील अत्यंत साध्या आणि भक्तीमय पद्धतीने घरी ही पूजा करू शकता
पूजेची तयारी आणि मांडणी
पूजेसाठी घराची ईशान्य किंवा पूर्व दिशा निवडा. जागा स्वच्छ करून तिथे चौरंग मांडावा. चौरंगावर नवीन लाल किंवा पिवळे कापड अंथरावे. त्यावर मध्यभागी गहू पसरून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशावर नारळ ठेवावा. कलशाच्या मागे श्री सत्यनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. उजव्या बाजूला गणपती म्हणून सुपारीची स्थापना करावी.
advertisement
साहित्याची मांडणी
पूजेसाठी तुळशीची पाने, फुले, हळद-कुंकू, अबीर-गुलाल, सुट्टे पैसे आणि पाच प्रकारची फळे तयार ठेवावीत. सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी साखर, सव्वा वाटी तूप, दूध आणि सव्वा केळी या प्रमाणाने 'सपाद भक्ष्य' प्रसाद बनवून ठेवावा.
पूजा विधी
दीपप्रज्वलन करून गणपतीची आणि कलशाची पूजा करावी. त्यानंतर सत्यनारायण देवाचे ध्यान करून त्यांना गंध, अक्षता, फुले आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. सत्यनारायणाची पोथी वाचावी. पाच अध्यायांची ही कथा ऐकणे किंवा वाचणे हा पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
आरती आणि नैवेद्य
कथा पूर्ण झाल्यावर देवाला प्रसादाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर कापूर लावून श्री सत्यनारायणाची आरती करावी. उपस्थितांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी.
दर महिन्याला पूजा केल्याने होणारे सकारात्मक बदल
1. नकारात्मकतेचा नाश: दर महिन्याला पूजा आणि मंत्रोच्चार केल्याने घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरामध्ये एक प्रकारचे ईश्वरीय संरक्षण कवच तयार होते, ज्यामुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते.
2. आर्थिक अडथळे दूर होतात: सत्यनारायण हे लक्ष्मीपती विष्णूंचे रूप आहे. दर पौर्णिमेला ही पूजा केल्याने व्यवसायात वृद्धी होते आणि अनावश्यक खर्च कमी होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.
3. कौटुंबिक सौख्य आणि शांती: पूजेच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. कथेतील सत्य आणि निष्ठेचे संस्कार मनावर बिंबवले जातात, ज्यामुळे घरातील वाद मिटून आपापसात प्रेम वाढते.
4. मानसिक शांती आणि आत्मविश्वास: नियमित पूजेमुळे मनातील भीती आणि चिंता दूर होतात. कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि व्यक्तीचा देवावरील विश्वास अधिक दृढ होतो.
5. कर्माचे शुद्धीकरण: सत्यनारायण कथा ही माणसाला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. दर महिन्याला ही कथा ऐकल्याने आपल्याकडून होणाऱ्या चुकांची जाणीव होते आणि सात्त्विक विचार प्रबळ होतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
