पोलिसांची कारवाई
बंगळुरू पोलिसांनी आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख आणि त्याची मूळ कंपनी डियाजिओचे कर्मचारी निखिल सोसाले यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावामुळे केएससीएचे दोन अधिकारी सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ईएस जयराम यांनी शनिवारी राजीनामा दिला. दुसरीकडे पीडितांच्या कुटुंबियांनी कठोर कारवाई आणि भरपाईची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे.
advertisement
बीसीसीआयने मात्र हा कार्यक्रम फ्रँचायझीचा होता आणि बोर्डाने आयोजित केला नव्हता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'ही घटना दुर्दैवी आहे, पण बीसीसीआयला काहीतरी करावं लागेल, आम्ही मुग गिळून गप्प बसू शकत नाही', अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी क्रिकबझशी बोलताना दिली आहे. 'हा आरसीबीचा खासगी कार्यक्रम होता, पण आम्ही भारतामधील क्रिकेटसाठी जबाबदार आहोत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, याची खात्री आम्हाला करावी लागेल', असं देवजित सैकिया म्हणाले आहेत.
आरसीबीवर कारवाई होणार का?
11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरसीबीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे, पण बीसीसीआय आरसीबीवर खरंच अशी कारवाई करू शकते का? याबाबत साशंकता आहे. आयपीएल हा बीसीसीआयचा सगळ्यात मोठा ब्रॅण्ड आहे. चेंगराचेंगरीच्या या घटनेमुळे बीसीसीआयलाही अडचणीत आणलं आहे, तसंच बीसीसीआयकडून आरसीबीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे, पण आरसीबीच्या फ्रँचायझीवर बंदीची कारवाई केली तर बीसीसीआय आणि आयपीएलला मोठ्या व्यावसायिक तसंच कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
दोन टीमवर बंदी
याआधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी या दोन्ही टीमवर ही कारवाई केली गेली होती. 2016 आणि 2017 साली चेन्नई आणि राजस्थान या दोन टीम आयपीएल खेळल्या नव्हत्या.