नेमकं काय घडलं?
पुण्यात झालेल्या एका सत्कार समारंभात बोलताना हर्षवर्धन अत्यंत भावुक झाला. दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकूनही प्रशासकीय पातळीवर आणि क्रीडा धोरणांबाबत त्याला अपेक्षित दाद मिळत नसल्याची सल त्याच्या बोलण्यातून जाणवली. "कधीकधी वाटतं की कुस्ती सोडून द्यावी," अशा अर्थाचं विधान त्याच्याकडून झालं होतं. यामुळे तो निवृत्ती घेणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं. त्यानंतर हर्षवर्धनने कुस्तीमधून निवृत्ती घेणार की नाही या चर्चांवरच पडदा टाकला.
advertisement
मी भावनेच्या भरात बोलले पण...
या चर्चेनंतर हर्षवर्धनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तो म्हणाला, "मी एक खेळाडू आहे आणि माझं आयुष्य कुस्तीसाठी समर्पित आहे. त्या दिवशी बोलताना मी थोडा भावुक झालो, कारण एका पैलवानाला ज्या संघर्षातून जावं लागतं, ते शब्दांत सांगणं कठीण आहे. कारकीर्द अजून खूप शिल्लक आहे, पण खेळाडूंना सन्मानाची वागणूक आणि हक्काची नोकरी मिळावी, हीच माझी माफक अपेक्षा आहे."
चाहत्यांचा पाठिंबा आणि सरकारला आवाहन
हर्षवर्धनच्या या 'इमोशनल' भाषणानंतर सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ लाट आली आहे. "महाराष्ट्र केसरी झाला तरी जर एका मल्लाला असं बोलावं लागत असेल, तर हे दुर्दैवी आहे," अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. हर्षवर्धनने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली आहे की, खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्न केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात सोडवावा. हर्षवर्धनची ही अस्वस्थता केवळ त्याची एकट्याची नसून, महाराष्ट्रातील अनेक उदयोन्मुख मल्लांची प्रातिनिधिक भावना आहे, असं आता कुस्ती वर्तुळात बोललं जात आहे.
हर्षवर्धन भावनेच्या भरात खूप काही बोलून गेला पण तसं काही नाही. त्याला अजून खूप काही करायचं आहे. थोड्या विश्रांतीनंतर भविष्यातील योजना करायला सुरुवात करू. सध्या राज्य शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया काका पवार यांनी दिली आहे. तर हर्षवर्धनला मिळालेल्या किताबाबद्दल त्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक देखील केलं.
