संजूने 50 बॉलमध्ये 12 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 97 रन केले. संजूने 194 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडिाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला संजूने केलेल्या नाबाद 97 रन या कोणत्याही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी आहे.
advertisement
सामन्यानंतर काय म्हणाला संजू?
'माझ्यासाठी हा क्षण म्हणजे संपूर्ण जग आहे. मी ज्या दिवसापासून खेळायला सुरूवात केली, देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहायला सुरूवात केली, त्या दिवसापासून मी या क्षणाची वाट पाहत होतो. आज मी खूप कृतज्ञ आहे, देवाचे आभार मानतो. माझा प्रवास चढ उतारांनी भरलेला आहे. मी अनेकदा स्वत:वर शंका घेतली. काय होईल? मी खरंच करू शकेन का? असे बरेच प्रश्न मनात आले. पण मी स्वत:वर विश्वास ठेवत राहिलो. देवाने मला आज आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे', अशी प्रतिक्रिया संजूने दिली.
रोहित-विराट द्रोणाचार्य
'मी हा फॉरमॅट इतक्या वर्षांपासून खेळत आहे, त्यामागे हेच कारण आहे. 10-12 वर्ष आयपीएल खेळलो, मागच्या 10 वर्षांपासून टीममध्ये होतो. प्रत्येक सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, तरी डगआऊटमधून खूप काही शिकलो. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या महान खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळाली. निरीक्षण करणे, त्यांचं खेळणं पाहणं, ते सामन्याच्या परिस्थितीनुसार आपला खेळ कसा बदलतात? हे समजून घेणं, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं', असं म्हणत संजूने विराट आणि रोहितला त्याच्या यशाचं श्रेय दिलं.
'मी कदाचित 50-60 सामने खेळलो असेन, पण मी जवळपास 100 सामने पाहिले आहेत. महान खेळाडू सामने कसे संपवतात? कशाप्रकारे परिस्थितीनुसार निर्णय घेतात, हे मी बारकाईने पाहिलं. मागच्या सामन्यात आम्ही पहिले बॅटिंग करत होतो, त्यामुळे मोठा स्कोअर उभारणं गरजेचं होतं, म्हणून मी पहिल्याच बॉलपासून आक्रमक खेळायचं ठरवलं. आजचा सामना पूर्णपणे वेगळा होता. जेव्हा जेव्हा मी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या विकेट पडत होत्या. पार्टनरशीप करणं महत्त्वाचं होतं, मी माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं', असं संजू म्हणाला.
'मी आज काहीतरी विशेष करेन, असं मला कधी वाटलं नव्हतं. मी फक्त माझ्या रोलवर लक्ष केंद्रित केलं आणि एकावेळी एक बॉल खेळत राहिलो. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे', असं वक्तव्य संजूने केलं आहे.
