पहिल्याच ओव्हरमध्ये एडन मार्करमने इशान किशनला आऊट करून टीम इंडियाला पहिला धक्का दिला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या तिलक वर्माकडून अपेक्षा होत्या, कारण तेव्हा टीम इंडियाला 10 रन पेक्षा कमीच्या रनरेटने आव्हानाचा पाठलाग करायचा होता. या परिस्थितीमध्ये तिलक वर्माने संयम दाखवण्याऐवजी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये मार्को यानसनच्या बॉलिंगवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तिलकने विकेट कीपर क्विंटन डिकॉककडे कॅच दिला.
advertisement
तिलक वर्मा फक्त 1 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतरही भारताला एकामागोमाग एक धक्के लागले, त्यामुळे टीम 20 ओव्हरही पूर्ण खेळू शकली नाही. या पराभवानंतर टीम इंडियाचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी तिलक वर्माच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आव्हान कठीण होतं, पण सुरूवातीपासून मोठे शॉट मारण्याची गरज नव्हती, असं गावसकर म्हणाले आहेत.
तिलक समजूतदार, पण...
मॅचनंतर स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत असताना गावसकरांनी तिलक वर्माच्या बॅटिंगबाबत नाराजी व्यक्त केली. 'तिलक समजूतदार बॅटर आहे, पण त्याचा अप्रोच पाहून मी निराश झालो. एक विकेट गेली होती, रनरेट 9.5 चा होता, 15 नाही. तुम्हाला थोडा वेळ द्यायला पाहिजे होता. अभिषेकने रन बनवले नव्हते, त्यामुळे पार्टनरशीप करून पॉवर प्ले खेळण्याची जबाबदारी त्याची होती. 70 नाही, पण 55 रनही चालल्या असत्या', असं वक्तव्य गावसकर यांनी केलं आहे.
तिलक वर्मा यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघर्ष करत आहे. 5 सामन्यांमध्ये त्याने 21.40 च्या सरासरीने आणि 118.88 च्या स्ट्राईक रेटने 107 रन केल्या आहेत. या सामन्याआधी तिलकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 70.85 च्या सरासरीने आणि 163.15 च्या स्ट्राईक रेटने 496 रन केले आहेत, ज्यात 2 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तिलक वर्माची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मागची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याच्याकडून टीम इंडियाला अपेक्षा होत्या, पण यात तो अपयशी ठरला.
टीम इंडियाची टॉप ऑर्डर सातत्याने अपयशी ठरत असताना तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूची भूमिका महत्त्वाची झाली आहे. टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेनडस्काटे याने संजू सॅमसनच्या पुनरागमनाबाबत विचार होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. संजूने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात 8 बॉलमध्ये 22 रन करून आक्रमक सुरूवात केली होती. सुपर-8 मध्ये पुढचे सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत, त्यामुळे या सामन्यात तिलक वर्माऐवजी संजू सॅमसनला संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
