पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय पीडित महिला चौथ्या टप्प्यातील कॅन्सरसोबत झुंज देत आहे. या गंभीर काळात त्या महिलेला भावनिक आधाराची फार गरज होती. परंतू तिचा पती तिला आधार देण्याऐवजी तिला त्रास, तिच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करत होता. पत्नीला मरणाच्या दारात टाकण्यासाठी पतीने कुठच्या कुठे पाऊल टाकलं. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच 36 वर्षीय महिलेला कॅन्सरचे निदान झाले आहे. तेव्हापासूनच तिचे सासरकडील मंडळी तिला आणखीनच त्रास देत आहेत. शेवटी तिने सासरकडील मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला.
advertisement
36 वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 2015 साली ती महिला केशरवानी नावाच्या कुटुंबात लग्न करून आली. तेव्हापासून सासरकडील मंडळी तिला हुंड्यासाठी मानसिक त्रास देत होते आणि तिचा शारीरिक छळ करत होते. इतकं कमी की काय, म्हणून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सासरी काळ्या जादूची पूजा मांडली जायची आणि तिला 'अपशकुनी' ठरवून त्रास दिला जात होता. 36 वर्षीय पीडित महिलेला सप्टेंबर 2025 मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं. या कठीण काळात पत्नीला भावनिक साथ द्यायची सोडून तिच्या पतीने लहान मुलासोबत घरातून हाकलून लावले. कॅन्सरचे निदान झाल्याचे समजताच तिला तिच्या माहेरी पाठवले.
पीडित महिला माहेरी गेल्यानंतर पतीने तिच्या माहेरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. 22 जानेवारी 2026 रोजी पतीने तिच्या घराच्या दरवाजासमोर कापलेले लिंबू- कुंकू, काळ्या रंगाची बाहुली आणि अघोरी पूजेचे साहित्य टाकून तिला जीवे मारण्यासाठी जादूटोणा केला होता. पीडित महिलेचे नाव, मिनाक्षी केशरवानी असं असून, तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी योगेशकुमार केशरवानी (पती), ओमकारनाथ केशरवानी (सासरा), चंद्रावती केशरवानी (सासू), भावना मल्होत्रा (नणंद) अनुराधा अरोरा (नणंद), श्रद्धा बोबडे (नणंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी पोलीस उपायुक्त (DCP) शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, निजामपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85, 115(2), 127 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम ३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
