नवी दिल्ली: चार संगीत कार्यक्रमांसाठी बांगलादेशात गेलेले प्रसिद्ध सरोदवादक शिराज अली खान यांनी आपली ओळख लपवून जीव वाचवत त्या देशातून पळ काढावा लागल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. न्यूज18 शी खास बातचीत करताना खान यांनी सांगितले की, सध्या बांगलादेशमध्ये भारतीय नागरिकांसाठी परिस्थिती अत्यंत असुरक्षित आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना आपल्या आडनावाचाही आधार घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
बांगलादेशात पोहोचल्यानंतर नेमकं काय घडलं?
मला चार संगीत कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 16 डिसेंबर रोजी मी बांगलादेशात पोहोचलो. सुरुवातीला परिस्थिती अगदी सामान्य वाटत होती. मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या फारच कमी होती. ते पाहून काहीतरी बिनसलेलं आहे, अशी जाणीव मला झाली. नंतर स्थानिक लोकांनी मला सांगितलं की परिस्थिती हळूहळू बिघडत चालली आहे आणि मी भारतीय असल्याचं कुठेही उघड करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
त्यानंतर काय घडलं?
17 डिसेंबर रोजी गुलशन परिसरात एका चेकपोस्टवर मला थांबवण्यात आलं. पोलीस लोकांची तपासणी करत होते आणि कुणाकडे परकीय चलन आहे का, याची खातरजमा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकून मी चकित झालो. माझ्याकडे फक्त आधार कार्ड होतं. मी स्वतःची ओळख शिराज अली खान अशी करून दिली आणि आपण भारतीय आहोत, हे मुद्दाम सांगितलं नाही. मला आधीच पासपोर्ट जवळ न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता, त्यामुळे तो माझ्याकडे नव्हता.
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही मला कुठेही माझी खरी ओळख सांगू नये, असंच बजावलं होतं. सामान्यतः मी बांगलादेशात गेल्यावर कोलकात्याची बंगाली भाषा बोलतो, पण यावेळी मी मुद्दाम स्थानिक बांगला बोलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने माझं आडनाव ‘खान’ असल्यामुळे मी त्यावर भर दिला आणि आपण मुस्लिम असल्याचं सूचित केलं.
पुढच्या दिवशी मला छायानट येथे काय घडलं, याची माहिती मिळाली. आम्हाला तिथे जाण्याचं नियोजन होतं. मी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बंद होता. कसाबसा मी भारतात परत येऊ शकलो.
तुमच्या सोबत असलेली टीम सगळी परतली आहे का?
माझी आई अजूनही बांगलादेशातच आहे, कारण आमचे काही नातेवाईक तिथे राहतात. त्यांनाही भारतात परत यायचं आहे. मी पाहिलं की अनेक भारतीय नागरिक पश्चिम बंगालमध्ये परतण्यासाठी अक्षरशः धडपड करत होते. माझा तबला वादक सोमवारी परत येईल, अशी अपेक्षा आहे.
तेथील लोकांमध्ये भारताविषयीची भावना कशी आहे?
माझी मुळं बांगलादेशात आहेत आणि मी नेहमी संगीताच्या माध्यमातूनच तिथे जात आलो आहे. पूर्वी लोक अतिशय आपुलकीनं वागत होते. मात्र आता सगळंच बदललं आहे. सध्या तिथे एकही भारतीय सुरक्षित नाही. वातावरण पूर्णपणे भारतविरोधी झालं आहे. लोक जणू काही जमाव हल्ले करण्यासाठी कारणंच शोधत आहेत. हा प्रश्न ‘खान’ असण्याचा नाही. कोणताही भारतीय तिथे सुरक्षित नाही.
बांगलादेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी तुमचा सल्ला काय आहे?
आयुष्यात असा अनुभव मला कधीच आला नव्हता. मी फक्त एवढंच सांगू शकतो की सध्या कुणीही तिथे जाऊ नये. सगळे लोक तिथून परतण्याचाच प्रयत्न करत आहेत. मला नेहमी वाटायचं की बांगलादेश हा आपल्या मुळांशी जोडलेला देश आहे आणि तिथे काही अडचण येणार नाही. पण परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मी पुन्हा तिथे जाणार नाही.
