बिश्नोई गँग भारतातून ऑपरेट होते. गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून मोबाईल फोनद्वारे या टोळीच्या कारवाया नियंत्रित करतो, असा आरोप आहे. कॅनडाच्या सरकारने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ही टोळी खून, गोळीबार, जाळपोळ आणि खंडणीमध्ये सहभागी आहे, विशेषतः भारतीय वंशाच्या लोकांना, त्यांच्या व्यवसायांना आणि सांस्कृतिक ठिकाणांना या टोळीकडून लक्ष्य केलं जातं.
advertisement
बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे आता कॅनेडियन तपास यंत्रणांना या टोळीविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तपास यंत्रणांकडून बिश्नोई गँगशी संबंधित लोकांची मालमत्ता जप्त करणं, त्यांची बँक खाती गोठवणे आणि त्यांच्या समर्थकांवर खटला चालवणं, अशा कारवाया केल्या जाऊ शकतात.
प्रेस रिलीजमध्ये असंही म्हटलं आहे की, आता कोणत्याही कॅनेडियन नागरिकाने या टोळीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणे किंवा त्यांच्याशी मालमत्तेचा कसलाही व्यवहार करणं, हा गुन्हा ठरेल.
गेल्या वर्षी, आरसीएमपीने दावा केला होता की भारत कॅनडामध्ये खून आणि खंडणी करण्यासाठी बिश्नोई टोळीचा वापर करत आहे, विशेषतः खलिस्तान चळवळीला पाठिंबा देणाऱ्यांना लक्ष्य करत आहे. तथापि, नवी दिल्लीने हे आरोप फेटाळून लावले आणि टोळीच्या आर्थिक कारवाया रोखण्यासाठी कॅनडासोबत काम करत असल्याचे सांगितले.
कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे की या पावलामुळे केवळ गुन्हेगारीला आळा बसणार नाही, तर भारतीय स्थलांतरित लोकांमध्ये देखील सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "कॅनडामध्ये हिंसाचार आणि दहशतवादाला कोणतेही स्थान नाही, विशेषतः जेव्हा एखाद्या विशिष्ट समुदायाला भीती आणि दहशतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जाते."