या करारामुळे भारत आणि इराणमधली धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी आणखी मजबूत झाली आहे. या कराराअंतर्गत, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडने (आयपीजीएल) बंदरात 120 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं आहे. भारताने 250 दशलक्ष डॉलर्सची क्रेडिट विंडोदेखील दिली आहे. पोर्ट-संबंधित पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी या क्रेडिट विंडोचा वापर केला जाईल.
इराणचे शहरविकास मंत्री मेहरदाद बाजारपाश यांनी करारावर सही करताना सांगितलं की, चाबहार बंदर हे या परिसरातल्या ट्रान्झिट डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू बनू शकते. या करारामुळे इराण आनंदी आहे आणि तिथल्या सरकारला भारतावर पूर्ण विश्वास आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी मुंबईत सांगितलं, की करारामुळे बंदरात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.
advertisement
आता हा करार प्रत्यक्षात आणण्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केलं जाईल. दोन्ही देशांना वाटतं, की चाबहार बंदर पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे या भागातल्या व्यापाराचा ओघ लक्षणीय वाढेल. यामुळे गुंतवणुकीला गती मिळेल आणि इतर देशही चाबहारचा पर्यायी व्यापार मार्ग म्हणून वापर करतील. 10 वर्षांच्या करारावर सही करून भारताने इराणसोबतचे संबंध मजबूत करून मध्य आशियात थेट प्रवेश केला आहे. चाबहार बंदराच्या मदतीने भारत मध्य आशियात वर्चस्व प्रस्थापित करू शकतो.
चाबहार बंदर महत्त्वाचं का आहे : चाबहार बंदर पाकिस्तानच्या सीमेजवळ आणि इराणच्या आग्नेय किनाऱ्यावर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारताला मध्य आशियात थेट प्रवेश मिळतो. इराण-पाकिस्तान सीमेजवळ ओमानच्या आखातावर असलेलं हे बंदर भारतासाठी एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग बनू शकतो. पाकिस्तानला बायपास करून भारत आपल्या व्यापार मार्गांमध्ये विविधता आणू शकतो. या बंदरामुळे भारताचं पाकिस्तानवरचं व्यापारी मार्गासाठीचं अवलंबित्वही कमी होऊ शकतं. अफगाणिस्तानसारखा लँडलॉक देश आणि उझबेकिस्तान, कझाकस्तान व तुर्कमेनिस्तानसारख्या मध्य आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी चाबहार बंदर विशेष फायदेशीर आहे. भारत आणि इराणमधील करारामध्ये आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरचा (आयएनएसटीसी) फायदा घेण्यात आला आहे. हे भारत, इराण, रशिया आणि युरोपला जोडणारं सात हजार 200 किलोमीटर लांबीचं नेटवर्क आहे.
वाचा - भारतीय निवृत्त कर्नल वैभव काळेंचा इस्रायल हल्ल्यात मृत्यू! इतिहासात पहिलीच घटना
चाबहार बंदराचे आर्थिक फायदे : भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारामुळे दोन्ही देशांना आर्थिक फायदा होणार आहे. चाबहार बंदराची कार्गो सामावून घेण्याची क्षमता वाढेल. कार्यक्षमता वाढेल आणि वाहतूक खर्चही कमी होईल. भविष्यात भारत, इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशिया यांच्यातल्या व्यापाराला चालना मिळेल. परिसरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
जिओपॉलिटिक्सवर परिणाम : चाबहार बंदराचा करार करून भारत आणि इराणने आपले संबंध अधिक दृढ होत असल्याचं दाखवून दिलं आहे. अमेरिका या कराराबाबत विशेष आनंदी नाही. अमेरिका बऱ्याच काळापासून बंदराच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे. नव्या करारामुळे भारत आणि इराणने आपलं आर्थिक स्वातंत्र्य जाहीर केलं आहे. दोन्ही देशांनी हितासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. चाबहार बंदरात भारतीय ऑपरेशन सुरू झाल्यामुळे व्यापाराचं स्वरूपही बदलेल.
