मुलं सांभाळत नाहीत, 75 वर्षांच्या आजोबांची तक्रार, प्रांताधिकाऱ्यांनी अशी घडवली अद्दल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Parents Care: आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोघा मुलांना प्रांताधिकाऱ्यांनी चांगलीच अद्दल घडवली. त्यामुळे वृद्ध आई-वडिलांना दिलासा मिळाला आहे.
सोलापूर – भारतीय परंपरेत आई-वडिलांना देवाचे स्थान दिले आहे. पण, आई-वडिल वयोवृद्ध झाल्यानंतर काही मुलं त्यांची देखभाल करत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका प्रकरणात प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी मुलांना चांगलाच धडा शिकवला आहे. आता या न्यायाचीच चर्चा होत असून वृद्ध आई-वडिलांना दिलासा मिळाला आहे.
नेमकं घडलं काय?
बार्शी तालुक्यातील उपळेधुमाला गावात राहणाऱ्या 75 वर्षीय सुभाष लक्ष्मण बुरगुटे यांना दोन मुलं जयंत आणि यशवंत तसेच मुलगी जयश्री अशी तीन अपत्ये असून तिघेही विवाहित आहेत. वडील सुभाष व आई शकुंतला यांना 2020 मध्ये मुलगा जयंत याने घराबाहेर काढले आणि यशवंत यांच्याकडे राहण्यास सांगितले. तेव्हा हे दाम्पत्य दुसरा मुलगा यशवंतकडे राहायला गेले.
advertisement
दुसरा मुलगा यशवंत याने दोन वर्ष आई-वडिलांचा सांभाळ केला. पण इथून पुढे सांभाळ करणं शक्य नसल्याचं सांगितलं. तेव्हा सुभाष बुरगुटे यांनी प्रांत अधिकारी पडदुणे यांच्याकडे मुलं सांभाळत नसल्याबाबत 18 जुलै 2025 रोजी अर्ज केला. त्या अर्जाची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना लेखी म्हणणे सादर करण्याची संधी दिली.
advertisement
दरम्यान, उपळे दुमाला, झाडी, पिंपरी (आर), निंबळक या गावांच्या हद्दीत 13 एकर 17 गुंठे बागायत जमीन आहे. तसेच उपळे दुमाला येथे राहते घर आहे. या बागायत जमिनीतून 2005 पासून आई-वडिलांना बेदखल करण्यात आलं असून मुले जयंत आणि यशवंत हे दोघे 50-50 टक्के हिस्सा घेतात, असं सुभाष यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
मुलगा जयंत याचं म्हणणं...
प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार पहिला मुलगा जयंत यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. परंतु, यशवंत यांनी आपले म्हणणे सादर केले. “शेतीत होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये तफावत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार नापिकीला सामोरं जावं लागत आहे. यंदा अतिवृष्टीने देखील शेतीचं नुकसान झालं आहे,” असं यशवंत यांनी सांगितलं.
advertisement
प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय...
view commentsमुलांचं म्हणणं ऐकल्यानंतर प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी उपळेदुमाला येथील घर आई-वडिलांना देण्यास सांगितले. तसेच वडिलोपार्जित 13 एकर 17 गुंठे जमिनीतील 50 टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना देण्याचे आदेश दिले. प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांचा आदर करावा, त्यांचा मान राखावा, त्यांचा योग्य सांभाळ करावा अन्यथा वडिलांनी दिलेली मालमत्ता रद्द करून पुन्हा पालकांच्या नावावर करण्यात येईल, असे प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी म्हटले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 13, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
मुलं सांभाळत नाहीत, 75 वर्षांच्या आजोबांची तक्रार, प्रांताधिकाऱ्यांनी अशी घडवली अद्दल










