खबरदार! धूलिवंदनसाठी फुगे फेकाल तर जेलमध्ये जाल, मुंबई पोलिसांचा कडक इशारा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगे किंवा प्लास्टिकच्या पिशव्या फेकल्यास आता कठोर कारवाई केली जाईल. होळीच्या दरम्यान बऱ्याचदा असे प्रकार घडले जातात.
मुंबई : होळी आणि धूलिवंदनाचा सण उत्साहाने साजरा करताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक नियम लागू केले आहेत. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगे किंवा प्लास्टिकच्या पिशव्या फेकल्यास आता कठोर कारवाई केली जाईल. होळीच्या दरम्यान बऱ्याचदा असे प्रकार घडले जातात. चालत्या ट्रेनवर पाण्याने भरलेले फुगे फेकले जातात यामुळे प्रवाशांना या त्रासाला सामोरं जावं लागतं.
कायदेशीर कारवाईची तरतूद
जर कोणी प्रवाशांवर पाण्याने भरलेले फुगे किंवा प्लास्टिकच्या पिशव्या फेकताना आढळले, तर भारतीय दंड संहितेच्या कलम 125 अंतर्गत त्यांना 2,500 दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. लोहमार्ग पोलिसांनी हा इशारा दिला आहे.
होळीच्या काळात विशेष सावधगिरी
रेल्वेच्या सायन, वडाळा, कुर्ला (मध्य रेल्वे) आणि वांद्रे, माहीम (पश्चिम रेल्वे) या भागांमध्ये प्रवाशांवर फुगे फेकण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडतात. त्यामुळे या ठिकाणी विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी मिळून रुळांलगतच्या वस्त्यांमध्ये प्रबोधन मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना होळी साजरी करताना प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांचे आवाहन
होळी हा आनंदाचा सण आहे, पण रंगांची उधळण जबाबदारीने करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करत आहोत, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले.
रेल्वे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. होळी साजरी करताना प्रवाशांना त्रास होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत. होळीचा उत्सव आनंदाने साजरा करा, पण इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळा आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याकडे लक्ष द्या, लोहमार्ग पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 12, 2025 8:33 AM IST