15 फूट उंच लाटा, चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील मुलं गेली वाहून, तरुणीचा बुडून मृत्यू, तरुण बेपत्ता
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली आहेत.
सरवर शेख, प्रतिनिधी भंडारा: तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली आहेत. यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अद्याप एक तरुण बेपत्ता आहे. महाराष्ट्रातील हे तिन्ही मुलं चेन्नई येथील एका बड्या आयटी कंपनीत इंटर्नशिप करत होते. शनिवारी सुट्टीच्या दिवशी जवळपास २६ जणांचा ग्रुप चेन्नई येथील बीचवर फिरायला गेला होता. याच वेळी समुद्र खवळला आणि महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेल्याचं समजत आहे.
मयुरी चौधरी असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. ती मूळची भंडारा येथील रहिवासी आहे. तर जळगाव येथील रहिवासी असलेल्या जय पाटील नावाचा युवक अद्याप बेपत्ता आहे. एकाला वाचवण्यात बचाव दलाला यश आलं आहे. परराज्यात महाराष्ट्रातील मुलांसोबत असं अनर्थ घडल्याने मूळ गावी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, कॉग्नीझंट या आयटी कंपनीच्या चेन्नई शाखेत महाराष्ट्रातील काही मुलं इंटर्नशिप करत आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने एकूण २६ तरुण-तरुणी चेन्नई येथील पुद्दुचेरी रोडवर असलेल्या कांथाट्टूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीचवर फिरायला गेले होते. यावेळी समुद्र काही प्रमाणात खवळला होता. अशा स्थितीत काही तरुण समुद्राच्या कडेला उभं राहून सेल्फी काढत होते. याच वेळी १० ते १५ फूट उंचीच्या लाटा उसळल्या आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
या घटनेची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे. त्यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत कार्यावर देखरेख ठेवून आहेत. तामिळनाडू सरकारकडून प्राप्त माहितीनुसार, 26 पैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यातील भंडाऱ्याच्या मयुरी चौधरी यांचा मृत्यू झाला तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचा शोध घेतला जात आहे. राज केदारी हे सुरक्षितपणे बाहेर आले आहेत. जय पाटील यांचे नातेवाईक हे चेन्नई येथे पोहोचले आहेत. मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नई येथे पोहोचत आहेत. तामिळनाडू सरकारने तातडीने सर्व मदत बचावकार्यात द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 1:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
15 फूट उंच लाटा, चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील मुलं गेली वाहून, तरुणीचा बुडून मृत्यू, तरुण बेपत्ता








