Vaibhav Suryavanshi : गंभीर-आगरकरची मीटिंग, टीम इंडियात यायचं असेल तर... वैभव सूर्यवंशीला अट घातली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातल्या एन्ट्रीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वैभवला सीनियर टीममध्ये प्रवेश देण्याआधी बीसीसीआयने नवीन रणनीती आखली आहे.
मुंबई : विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर.अश्विन या अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय टेस्ट टीम स्थित्यंतरातून जात आहे. या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय टेस्ट क्रिकेटची नवीन टीम तयार करण्यासाठी सिस्टीम तयार करत आहे. ही सिस्टीम विकसित करण्यासाठी बीसीसीआय निकाल नाही तर मुलभूत गोष्टींवर काम करणार आहे. बंगळूरुमधील बीसीसीआयचे सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रक्रियेचं नेतृत्व करेल, ज्याचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आहे.
बीसीसीआयच्या या नवीन रणनीतीमधील सगळ्यात चर्चेत असलेला खेळाडू वैभव सूर्यवंशी आहे. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे टीम इंडियाचा भावी स्टार म्हणून पाहिले जात आहे. वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात आणण्याची मागणी आधीपासूनच सुरू झाली आहे. वैभवसोबतच आयुष म्हात्रे आणि समीर रिझवी हे देखील बीसीसीआयच्या योजनेचा भाग आहेत.
बीसीसीआयने आखला मास्टर प्लान
पीटीआयच्या वृत्तानुसार बीसीसीआयने जून-जुलै महिन्यात चार टीममध्ये 4 दिवसीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात 64 क्रिकेटपटू सहभागी होतील. हे सर्व खेळाडू 25 वर्षांच्या खालचे असतील. टेस्ट क्रिकेटसाठी या खेळाडूंचं तंत्र, संयम आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता तपासली जाणार आहे, यासाठी या खेळाडूंना वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर सामने खेळावे लागणार आहेत.
advertisement
या योजनेचा उद्देश फक्त स्पर्धा आयोजित करणे हा नाही तर पुढच्या 10 वर्षांसाठी टेस्ट टीमसाठी मजबूत खेळाडूंचा ग्रुप तयार करणं आहे. ज्या 64 खेळाडूंची निवड केली जाणार आहे त्यात ज्युनियर क्रिकेट (कूचबिहार ट्रॉफी, सीके नायडू ट्रॉफी) खेळलेले 25 खेळाडू, रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत स्पर्धा खेळलेले 25 खेळाडू आणि आयपीएलमधील उदयोन्मुख खेळाडू असतील.
advertisement
आगरकर-गंभीरची भूमिका
निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. बीसीसीआयची ही योजना दीर्घकालीन आहे. भारतीय टेस्ट टीमची निवड भविष्यात या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर केली जाणार आहे. आयपीएल 2026 संपल्यानंतर भारताची अंडर-19 टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे जिथे ते चार दिवसीय सामने खेळणार आहेत.
advertisement
मागच्या दीड वर्षांमध्ये भारतीय टेस्ट टीमच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. भारतामध्ये सलग 12 वर्ष अपराजित राहिलेल्या भारतीय टीमला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून टेस्ट सीरिजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बीसीसीआयने तातडीने पावलं उचलली आहेत. बीसीसीआयची ही योजना यशस्वी झाली तर येत्या काही वर्षांमध्ये भारतीय टीमला टेस्टमध्ये पुन्हा जुने दिवस येऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 8:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : गंभीर-आगरकरची मीटिंग, टीम इंडियात यायचं असेल तर... वैभव सूर्यवंशीला अट घातली!









