कृषी हवामान : कोकणासह घाटमाथ्यावर पाऊस धुमाकूळ घालणार, पिकांची कशी काळजी घ्याल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Upate : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता.31 ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहून, ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींचा अंदाज आहे.
हवामान स्थिती
सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, सेओनी, दुर्ग, भवानीपट्टनम, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच उत्तर कोकण आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीमुळे गेल्या काही दिवसांत राज्यात अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली.
शनिवारी (ता. 30) सकाळपासून राज्यात पाऊस कमी झाला आणि हवामानात उघडीप दिसून आली. मात्र त्याचबरोबर तापमानात वाढ नोंदली गेली. सकाळपर्यंतच्या 24 तासांत भंडारा येथे राज्यातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमान तर ब्रह्मपुरी येथे 35.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
advertisement
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
येलो अलर्ट : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, गडचिरोली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.
उर्वरित जिल्हे : हवामानात उघडीप, ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता.
पाऊस उघडल्यानंतर शेतीसाठी मार्गदर्शन
पावसाने उघडीप दिल्यानंतर खरीप पिकांच्या वाढीसाठी योग्य वेळी योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. शेतकऱ्यांनी पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे :
advertisement
कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी फवारणी
सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांवर अळी व बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. यासाठी योग्य कीडनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी.
कापसावर गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप्सचा वापर आणि शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी.
सोयाबीनमध्ये पाने पिवळी पडणे, गळ होणे यावर तांब्याचे बुरशीनाशक किंवा कार्बेन्डाझीम वापरावे.
खत व्यवस्थापन
पावसानंतर पिकांची वाढ वेगाने सुरू होते. यावेळी युरिया (नत्र) टॉप ड्रेसिंगने द्यावा. सोयाबीन व डाळवर्गीय पिकांसाठी फॉस्फरस व पोटॅशियमयुक्त खते उपयुक्त ठरतात. भात पिकात पावसामुळे नत्र कमी झाले असल्यास अमोनियम सल्फेट किंवा युरियाची मात्रा विभागून द्यावी. कापसात नत्राबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये (जस्त, मॅग्नेशियम, बोरॉन) यांची फवारणी करणे फायदेशीर ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 8:56 AM IST