Success Story : जालन्याची कृषीकन्या अंकिताचं राज्यभरात होतंय कौतुक! या व्यवसायात १० लाखांची गुंतवणूक करत वर्षाला करतेय २६ लाखांची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : स्वप्न पाहण्यासाठी कोणत्याही भांडवलाची गरज नसते, मात्र ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. जालना जिल्ह्यातील गोलार्पगरी गावातील अंकिता मोरे यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे.
मुंबई : स्वप्न पाहण्यासाठी कोणत्याही भांडवलाची गरज नसते, मात्र ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. जालना जिल्ह्यातील गोलार्पगरी गावातील अंकिता मोरे यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. कुक्कुटपालन व्यवसायातून त्यांनी केवळ आर्थिक प्रगतीच साधली नाही, तर स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे गावातील अनेक तरुण आणि शेतकरी स्वावलंबनाकडे वळत आहेत.
शिक्षण आणि शेतीचा वारसा
अंकिता मोरे पाटील या कृषी पदवीधर असून सध्या त्या सुमारे ५ हजार गावरान कोंबड्यांचे पालन करत आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे ३५ एकर शेती असून मोसंबी, टरबूज, सोयाबीन, ऊस यांसारखी विविध पिके घेतली जातात. त्यांच्या आयुष्यात जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेत्या सौ. छायाताई मोरे यांचा मोठा प्रभाव आहे.
कोविड काळात संधीचे सोने
सन २०१९-२० मधील कोविड-१९ काळात संपूर्ण जग ठप्प झाले होते. उद्योग, वाहतूक आणि बाजारपेठ बंद असतानाही अंकिता यांनी या संकटात संधी शोधली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षापासून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आणि घरच्यांच्या पाठबळावर त्यात यश मिळवले.
advertisement
व्यवसायाची सुरुवात कशी झाली?
घरातील रिकाम्या गोठ्याचा उपयोग करून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. गोठ्याचे रूपांतर शेडमध्ये करून जाळी, फीडर आणि पाण्याची व्यवस्था केली. नंतर पक्ष्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी द्राक्षबागेतही शेड उभारले. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यावर त्यांनी भर दिला.
ब्रूडिंग आणि लसीकरणाचे व्यवस्थापन
सुरुवातीला ५०० पिल्लांपासून व्यवसाय सुरू करण्यात आला. ब्रूडिंगच्या २१ दिवसांच्या कालावधीत पिल्लांना कृत्रिम उब देण्यात आली. या काळात दोन वेळा लसीकरण करणे आवश्यक असते. अंकिता यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व पक्ष्यांचे लसीकरण केले. हळूहळू हा व्यवसाय ५०० वरून १५०० आणि आता ५,००० पक्षांपर्यंत वाढला आहे.
advertisement
खाद्य व्यवस्थापनात नवकल्पना
सुरुवातीला बाहेरून खाद्य मागवले जात होते, मात्र खर्च वाढत असल्याने अंकिता यांनी स्वतः खाद्य तयार करण्यास सुरुवात केली. मक्याचा भरडा, शेवग्याचा पाला, दुधीचा पाला आणि लसूण घास यांचा समावेश करून त्यांनी पोषक आहार तयार केला. त्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि विविध जीवनसत्त्वेही दिली जातात.
पक्ष्यांची देखभाल आणि सुरक्षितता
पक्ष्यांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांनी दोन महिला मदतनीस ठेवले आहेत. दिवसातून तीन वेळा पक्षांना खाद्य दिले जाते. पक्षांना मोकळ्या वातावरणात ठेवले जाते, त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. शेताभोवती कुंपण, जाळी आणि सुरक्षा व्यवस्था करून प्राण्यांपासून संरक्षण केले जाते.
advertisement
२६ लाखांचा नफा
या व्यवसायासाठी सुमारे १० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून १० महिन्यांत तब्बल २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या स्थानिक बाजारात गावरान कोंबड्यांना चांगला दर मिळत आहे. एका पक्षाला सुमारे ७०० रुपये दर मिळतो. निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू असून त्यातून अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 7:31 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : जालन्याची कृषीकन्या अंकिताचं राज्यभरात होतंय कौतुक! या व्यवसायात १० लाखांची गुंतवणूक करत वर्षाला करतेय २६ लाखांची कमाई







