ऊसाचा नाद सोडला! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं ओळखलं मार्केट, आता या शेतीतून 12 महीने करतोय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : बदलत्या काळात शेतीही बदलते आहे. कमी पाण्यात, कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, याचा शोध आज अनेक शेतकरी घेताना दिसतात.
मुंबई : बदलत्या काळात शेतीही बदलते आहे. कमी पाण्यात, कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, याचा शोध आज अनेक शेतकरी घेताना दिसतात. पारंपरिक उस, गहू किंवा ज्वारीसारख्या पिकांऐवजी आता काही शेतकरी फळपिके, मसाल्याची पिके आणि भाजीपाला याकडे वळले आहेत. अशाच एका यशस्वी प्रयोगाची सध्या अहमदनगर जिल्ह्यात चर्चा होत असून, नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्याने उसासाठी प्रसिद्ध असलेल्या जमिनीत अवघ्या अडीच एकर क्षेत्रात आल्याची शेती करून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.
advertisement
आल्याचा प्रयोग ठरला यशस्वी
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावचे शेतकरी संग्राम येळवंडे यांनी पारंपरिक ऊस शेतीला बाजूला ठेवत आल्याच्या लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला हा प्रयोग धोकादायक वाटत असला, तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. मागील वर्षी केवळ एका एकर क्षेत्रात आल्याची लागवड करून त्यांनी तब्बल 108 क्विंटल उत्पादन घेतले होते. त्यावेळी शेतावरच त्यांना प्रति क्विंटल सुमारे 9 हजार रुपये दर मिळाला आणि जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
advertisement
एकरी 9 ते 10 क्विंटल बियाणाचा वापर केला
आल्याच्या शेतीसाठी त्यांनी आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला. सेंद्रिय खतांचा वापर, ठिबक सिंचन व्यवस्था आणि योग्य अंतरावर लागवड यामुळे उत्पादनात वाढ झाली. यावर्षी त्यांनी एकरी 9 ते 10 क्विंटल बियाण्याचा वापर केला. लागवडीपूर्वी शेतात योग्य प्रकारे बेड तयार करण्यात आले आणि बायोमी टेक्नॉलॉजीच्या कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचा आधार घेतला. त्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली आणि रोगराईचे प्रमाणही कमी राहिले.
advertisement
आल्याबरोबरच संग्राम येळवंडे हे कांदा, ऊस तसेच फळबागांमध्ये आंबा अशी विविध पिके घेतात. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना त्यांचे भाऊ धनंजय येळवंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. पेशाने इंजिनियर असलेल्या भावाच्या तांत्रिक सल्ल्यामुळे शेतीत नव्या प्रयोगांना चालना मिळाल्याचे संग्राम सांगतात.
पारंपरिक शेतीला छेद देत मसाल्याच्या पिकातून यशस्वी आर्थिक मॉडेल उभे करणाऱ्या संग्राम येळवंडे यांचे आज संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह परिसरात कौतुक होत आहे. त्यांचा हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा मार्ग दाखवणारा आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 7:32 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
ऊसाचा नाद सोडला! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं ओळखलं मार्केट, आता या शेतीतून 12 महीने करतोय लाखोंची कमाई








