ना वीज, ना सोलार, तरीही शेतीला 24 तास पाणी, जालन्यातील शेतकऱ्याचं जुगाड
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture: शेतीसाठी पाणी आणि सिंचनासाठी वीज हेच शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न असतात. जालन्यातील शेतकऱ्याने यासाठी केलेल्या जुगाडामुळे आता शेतीला 24 तास पाणी मिळतंय.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: शेतीसाठी पाणी आणि पाणी सिंचनासाठी वीज या दोन बाबी शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही ठिकाणी पाण्याची समस्या असते तर कुठं शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता असून देखील बहुतांश वेळा विजेची समस्या असते. सोलर पॅनल बसवून विजेच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास देखील काही मर्यादा आहेत. जालना जिल्ह्यातील एक शेतकरी वीज आणि सोलरशिवाय शेतीला 24 तास पाणी देतोय. शेतकरी रामप्रसाद खैरे यांनी नेमका काय जुगाड केलाय? पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यातील वखारी या छोट्याशा गावातील रामप्रसाद खैरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात खास प्रयोग केला आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 20 एकर शेत जमीन आहे. या शेतजमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतातील उंचवट्यावर शेततळे घेतले. या माध्यमातून ते आपल्या शेतामध्ये मोसंबी, गहू, ज्वारी अशी पारंपरिक पिके घ्यायचे. मात्र विजेच्या समस्येमुळे ते त्रस्त होते. त्यानंतर त्यांनी सौर ऊर्जा पॅनल आपल्या शेतामध्ये बसवले. मात्र ढगाळ हवामानात त्यासाठी देखील अडचणी येत होत्या. तेव्हा त्यांनी देशी जुगाड करून 24 तास पाणी उपलब्ध होईल अशी सोय केली.
advertisement
काय आहे जुगाड?
शेततळे शेताच्या उंचवट्यावर आहे. त्यामुळे हवेच्या दाबाचा वापर करून सायफन पद्धतीने वाल बसवून जुगाड केला. 15 ते 20 फूट लांबीचा एक पाईप घेऊन त्याला समोरून एक वाल बसवला. पाईपमध्ये पाणी भरून त्याला शेततळ्यामध्ये सोडण्यात आलं. पाईपचा वालकडील भाग हा शेततळ्याच्या खाली जमिनीवर तर दुसरा भाग हा शेततळ्यातील पाण्यात ठेवण्यात आला. यानंतर वाल सुरू करण्यात आला. अशा पद्धतीने हवेच्या दाबाने शेततळ्यातील पाणी कॉक सुरू करतात. हाच प्रयोग त्यांनी शेततळ्याच्या चारही बाजूने केला असून चार सायफनच्या माध्यमातून 20 एकर शेताला 24 तास पाण्याची सोय उपलब्ध होत आहे.
advertisement
दरम्यान, हा प्रयोग यशस्वी ठरला असून शेतीसाठी 24 तास पाणी मळतंय. तसेच वीज आणि सोलारचं टेन्शन राहिलं नाही. असा प्रयोग करून कुणीही शेतकरी 24 तास पाण्याची सोय करू शकतात. यासाठी शेततळे किंवा सिंचनाचा स्रोत हा उंचवट्यावर असणं गरजेचं असल्याचं शेतकरी खैरे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 19, 2024 1:28 PM IST







