अखेर! भारत-अमेरिका करार झाला, करारात संरक्षण असलेली प्रमुख कृषी उत्पादने कोणते?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित अंतरिम व्यापार कराराबाबत महत्त्वाची प्रगती झाली असून, दोन्ही देशांनी या कराराची एक प्राथमिक चौकट जाहीर केली आहे.
मुंबई : भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित अंतरिम व्यापार कराराबाबत महत्त्वाची प्रगती झाली असून, दोन्ही देशांनी या कराराची एक प्राथमिक चौकट जाहीर केली आहे. या चौकटीअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील परस्पर (रिसिप्रोकल) आयात शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक भारतीय उद्योगांना अमेरिकेच्या बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक संधी मिळणार आहेत.
या कराराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या कृषी क्षेत्राला देण्यात आलेले संपूर्ण संरक्षण. संयुक्त निवेदनानुसार, भारताने कृषी व दुग्धजन्य उत्पादनांबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अन्नधान्य व शेतीसंबंधित वस्तूंवर आयात शुल्क सवलत देण्यास भारताने स्पष्ट नकार दिला आहे.
शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राधान्य
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा करार भारताच्या शेतकरी हितसंबंधांप्रती असलेली ठाम भूमिका अधोरेखित करतो. ग्रामीण उपजीविका, लहान व अल्पभूधारक शेतकरी आणि देशांतर्गत कृषी उत्पादन यांचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन, दूध व दुग्धजन्य पदार्थ, इथेनॉल (इंधन), तंबाखू, काही भाज्या आणि मांस यांसारख्या उत्पादनांवर कोणतीही आयात सवलत देण्यात आलेली नाही. यामुळे परदेशी स्वस्त आयातीचा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसणार नाही, असा सरकारचा दावा आहे.
भारतीय उद्योगांना अमेरिकन बाजारपेठ खुली
कृषी क्षेत्र संरक्षित ठेवत असतानाच, या अंतरिम करारामुळे भारतीय औद्योगिक उत्पादनांसाठी अमेरिकेचा मोठा बाजार खुला होणार आहे. वस्त्रोद्योग, पादत्राणे, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी उत्पादने, तसेच विमानांचे सुटे भाग यांसारख्या क्षेत्रांवरील अमेरिकेचे आयात शुल्क ५० टक्क्यांवरून सुमारे १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
advertisement
या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांची स्पर्धात्मकता वाढेल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्यापारातील तणाव कमी करून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.
संरक्षित ठेवलेली प्रमुख कृषी उत्पादने
या करारात भारताने मुख्य अन्नधान्यांवर पूर्ण नियंत्रण राखले आहे. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, रागी, कुटू, ओट्स तसेच विविध प्रकारच्या मिलेट्स आणि त्यापासून तयार होणारे पीठ यांवर कोणतीही शुल्क कपात किंवा कोटा लागू होणार नाही.
advertisement
दुग्ध व्यवसायाशी संबंधित दूध, तूप, लोणी, दही, ताक, चीज, व्हे प्रथिने आणि इतर दुग्धजन्य पदार्थांनाही पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे.
भाज्या व कडधान्यांच्या बाबतीतही भारताने कठोर भूमिका घेतली असून, बटाटे, वाटाणे, काकडी, मशरूम, गोठवलेल्या व प्रक्रिया केलेल्या भाज्यांवर सवलत दिलेली नाही.
advertisement
काही अमेरिकी उत्पादनांना मर्यादित प्रवेश
संवेदनशील क्षेत्रे सुरक्षित ठेवत असतानाच, या करारामुळे काही अमेरिकी उत्पादनांना भारतीय बाजारात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये जनावरांच्या खाद्यासाठी काही घटक, सुकामेवा, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, वाईन आणि मद्य यांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 8:22 AM IST










