नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य
हरिओम नौटियाल असे या तरुणाचे नाव असून, ते उत्तराखंडमधील डेहराडूनचे रहिवासी आहेत. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरिओम एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होते. आर्थिक स्थैर्य असूनही नोकरीत त्यांचे मन रमले नाही. सततच्या ठराविक कामामुळे आणि मर्यादित स्वातंत्र्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना अनेकांनी त्यांना विरोध केला, काहींनी तर हा निर्णय धाडसी आणि चुकीचा असल्याचेही सांगितले. मात्र, हरिओम यांनी आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नोकरीला रामराम ठोकला आणि गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दहा गायींपासून सुरू झालेला प्रवास
गावी परतल्यानंतर हरिओम यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केली. सुरुवातीला त्यांनी अवघ्या दहा गायींवर व्यवसाय सुरू केला. पहिल्या काही महिन्यांत अनेक अडचणी आल्या. दूध उत्पादन चांगले होत होते, मात्र विक्रीसाठी योग्य बाजारपेठ मिळत नव्हती. कधी दर कमी, कधी वाहतुकीचा प्रश्न तर कधी ग्राहकांचा अभाव अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी हार मानली नाही. सातत्य, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर त्यांनी व्यवसाय टिकवून ठेवला.
दूध संकलन केंद्राने दिली नवी दिशा
हळूहळू हरिओम यांना स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा मिळू लागला. अनेक लहान शेतकरी आणि पशुपालक त्यांच्यासोबत जोडले गेले. याच पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये हरिओम यांनी दूध संकलन केंद्राची स्थापना केली. या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला पूर्णपणे नवे वळण मिळाले. दूध थेट शेतकऱ्यांकडून संकलित करून प्रक्रिया आणि विक्री करण्याची साखळी उभी राहिली. त्यामुळे उत्पादन वाढले, खर्च कमी झाला आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली.
गुणवत्तेवर भर, ग्राहकांचा विश्वास
हरिओम यांनी सुरुवातीपासूनच दुधाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. शुद्ध, ताजे आणि कोणतीही भेसळ नसलेले दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा आग्रह राहिला. ‘धान्य धेनू’ या नावाने त्यांनी आपल्या उपक्रमाची ओळख निर्माण केली. आज डेहराडून आणि ऋषिकेश परिसरात दररोज सुमारे २५० लिटर दूध विक्री केली जाते. अनेक ग्राहक गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे त्यांच्याकडून दूध घेत आहेत, हे त्यांच्या विश्वासार्हतेचे मोठे उदाहरण आहे.
दोन कोटींची उलाढाल आणि रोजगारनिर्मिती
दूध विक्रीपुरतेच न थांबता हरिओम यांनी व्यवसायाचा विस्तार केला. मावा, आईस्क्रीम, रबडी, फालूदा तसेच घरगुती पद्धतीने बनवलेली लोणची अशी विविध उत्पादने त्यांनी बाजारात आणली. स्थानिक बाजारपेठा आणि व्यापारी मेळ्यांमधून या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे या दुग्ध व्यवसायातून १५ गावांतील सुमारे ५०० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे.
