जालना: कांदा उत्पादनासाठी नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे. तर कांद्याच्या बीज उत्पादनासाठी जालना जिल्हा ओळखला जातो. यंदा मात्र बीज उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठ संकट आहे. कांद्याच्या बियांचं चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी परागीभवन अत्यंत महत्त्वाचं असतं. कांद्याच्या बीजोत्पादनामध्ये परागीभवनासाठी मधमाशा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. मात्र मधमाशांचे प्रमाण अत्यल्प असल्याने बीज उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. ही घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोण कोणते उपाय केले पाहिजेत? याबाबत कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ एस व्ही सोनुने यांनी माहिती दिलीये.
advertisement
जालना जिल्ह्यामध्ये कांदा बीज उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामामध्ये राज्यभरात बीज उत्पादनासाठी कांद्याची लागवड केली जाते. परंतु मधमाशांचे प्रमाण अत्यल्प असल्याने उत्पादनात 30 ते 40 टक्के पर्यंत घट अपेक्षित आहे. मधमाशा विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यास त्या कांदा फुलोरा अवस्थेत असताना परागीभवनात महत्त्वाची भूमिका निभावतात. यामुळे शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळतं आणि त्यांची चांगली आर्थिक कमाई होते. मात्र मधमाशाच उपलब्ध नसल्याने नैसर्गिक परागी भवन अत्यंत कमी प्रमाणात होणार आहे. परंतु, शेतकरी काही उपाय करून होणारं संभाव्य नुकसान टाळू शकतात.
ना गाडी ना बंगला, दाम्पत्यानं दीड एकर जमीन विकली अन् गावासाठी बांधली 205 शौचालयं!
हे करा उपाय
कमी क्षेत्र असलेले शेतकरी सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान हाताने कांद्याच्या गोंड्याला हात फिरवून कृत्रिम परागीभवन करू शकतात. याचा चांगला उपयोग दहा गुंठ्यापासून अर्ध्या एकर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. तर ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या क्षेत्रावर कांदा लागवड आहे त्यांनी घरी असलेल्या साडीच्या माध्यमातून दोन व्यक्तींच्या सहाय्याने साडी कांद्यावर फिरवून कृत्रिम परागीभवन करता येते. तर तिसरा उपाय म्हणजे एक एकर क्षेत्रासाठी दोन ते तीन मधमाशांच्या पेट्या आपल्या शेतामध्ये ठेवून शेतकरी कांद्याचे परागीभवन वाढवून उत्पन्न वाढवू शकतात. मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवताना त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणं अत्यंत महत्त्वाचं असेल, असं खरपुडी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनवणे यांनी सांगितलं.





