मुंबईत निर्णायक बैठक
बच्चू कडू आज मुंबईकडे रवाना झाले असून, संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय झाल्यास नागपूरमधील आंदोलन थांबू शकतं, अशी चर्चा राज्यभर पसरली आहे.
advertisement
बच्चू कडूंनी फॉर्म्युला सांगितला
मुंबईला रवाना होताना बच्चू कडू यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “कर्जमाफी ही फक्त खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठीच असावी. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, सरकारी नोकरीत आहेत, पेन्शन घेतात, व्यापारी आहेत किंवा ज्यांनी फक्त गुंतवणुकीसाठी शेती घेतली आहे.त्यांना कर्जमाफी मिळू नये.”
ते पुढे म्हणाले, “आज डिजिटल युगात सरकारला प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती तपासणे सोपे झाले आहे. त्यामुळे सरकारने गरजवंत शेतकऱ्यांना ओळखून त्यांना त्वरित मदत द्यावी. खऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळालाच पाहिजे.”
जरांगे यांचा सरकारवर आरोप
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली आहे आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलं, “मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनात आलो आहे. पण सरकारने आंदोलन कमकुवत करण्यासाठी डाव टाकला आहे. त्यांच्या षडयंत्राला आता उत्तर द्यावं लागेल.”
जरांगे पुढे म्हणाले, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने अतिशय कमी मदत केली आहे. आम्ही १०० टक्के भरपाईची मागणी करतो. सरकारने आत्ताच योग्य पाऊल उचललं पाहिजे. सगळे शेतकरी एकत्र आले तर कुणीही आपल्याला थांबवू शकणार नाही.”
दरम्यान, आजच्या बैठकीत या मुद्यांवर चर्चा होणार असून, राज्यभरातील शेतकरी या बैठकीकडे आशेने पाहत आहेत.
