महाराष्ट्रीयन कुटुंबातील शाम आणि गुजराती कुटुंबातील गीता – दोघांची ओळख होती. कुटुंबीय संबंधही होते. पण त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होईल, याची कल्पना दोघांनाही नव्हती. संक्रांतीच्या दिवशी गीता पांढऱ्या साडीत शाम यांच्या घरी आली आणि त्या एका क्षणाने शाम यांच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. “पहिल्याच भेटीत ती मनाला भावली,” असं शाम हसत सांगतात. थेट बोलण्याची संधी मिळत नव्हती. योगायोगाने शाम यांची वर्गमैत्रीण ही गीताची भाची निघाली आणि त्या निमित्ताने संवाद सुरू झाला.
advertisement
मात्र त्या काळात समाज, जात, परंपरा यांची बंधनं घट्ट होती. त्यामुळे भावना व्यक्त करणं सोपं नव्हतं. शेवटी शाम यांनी चिठ्ठीचा मार्ग निवडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी कागदावर उतरवल्या. चिठ्ठी गीतांपर्यंत पोहोचली “त्या वेळी आमच्यात खूप अंतर होतं. आम्ही वेगवेगळ्या समाजातून होतो. त्यामुळे कधी प्रेमाचा विचारच केला नव्हता. पण कळत नकळत मी त्यांच्या प्रेमात पडले,” असं गीता आज सांगतात.जेव्हा लग्नाचा विचार पुढे आला, तेव्हा दोन्ही घरच्यांचा तीव्र विरोध झाला.
गीतांना तब्बल सहा महिन्यांसाठी हैदराबादला पाठवण्यात आलं. संपर्क पूर्णपणे तुटला. पण प्रेम थांबलं नाही. शाम हैदराबादला गेले, गीताच्या घरच्यांशी बोलले. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला गेला – “उद्याच तुझ्या घरच्यांनी तुला घराबाहेर काढलं, तर तू हिला कसा सांभाळशील?”हा प्रश्न शाम यांनी मनावर घेतला. ते नाशिकला गेले. छोटी-मोठी कामं केली. स्वतःचा व्यवसाय सुरू केला. स्वतःच्या पायावर उभे राहिले… आणि मग दोघांचं लग्न झालं.लग्नानंतरही अडचणी आल्या. आर्थिक चढ-उतार, सामाजिक दबाव, कुटुंबीयांचा विरोध — पण एक गोष्ट कधी बदलली नाही… ती म्हणजे एकमेकांवरील विश्वास.
आज भाषिक वादामध्ये , प्रांतवादामध्ये आपण अडकलेलं आहोत अशा काळामध्ये आज 48 वर्षांनंतरही गीता आणि शाम खांबेकर यांचा संसार तितक्याच उत्साहाने सुरू आहे. दोन्ही संस्कृतींचा हा मिलाफ त्यांच्या मुलांमध्ये देखील तितक्याच काळजीपूर्वक सांभाळला जातो.ब्रेकअप आणि हार्टब्रेकच्या या काळात त्यांची प्रेमकहाणी एक संदेश देते.खरं प्रेम हे फक्त बोलण्यात नसतं, ते निभावण्यात असतं.





