Mumbai: लोकलच्या गर्दीतून सूटका! आता ‘जल मेट्रो’ सुसाट, 10 मार्गांचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Water Metro: सध्या 21 जलमार्गांवर सुमारे 85 किमी अंतरावर जलवाहतूक सुरू आहे. तर 10 नवीन मार्ग प्रस्तावित आहेत.
मुंबई: समुद्रकिनारी वसलेल्या मुंबई महानगर क्षेत्रासाठी जलवाहतूक हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. स्वस्त आणि जलद प्रवासासाठी आता ‘जल मेट्रो’ प्रकल्पाला वेग देण्यात आला आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प फायद्याचा ठरणार असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोची जल मेट्रोच्या यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो सेवा सुरू करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाने पुढाकार घेतला आहे.
advertisement
ऑगस्ट 2025 मध्ये सादर झालेल्या प्राथमिक अहवालात 21 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. 10 नवीन जलमार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर या परिसरांना जलमार्गाने जोडण्याची योजना आहे. या मार्गांमुळे शहरातील विद्यमान रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
सध्या 21 जलमार्गांवर सुमारे 85 किमी अंतरावर जलवाहतूक सुरू आहे. प्रस्तावित 10 नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर एकूण जलमार्गांची लांबी सुमारे 200 किमीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे लोकल, मेट्रो, बस आणि सागरी सेतू यांना पूरक असा आणखी एक पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
advertisement
मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या 2030 पर्यंत 3 कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना जल मेट्रो हा पर्यावरणपूरक, जलद आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. विस्तीर्ण किनारपट्टीचा लाभ घेत आधुनिक जलवाहतूक प्रणाली उभारण्यावर भर दिला जात आहे.
हा प्रकल्प ‘सागरमाला योजना 2.0’ अंतर्गत राबवण्याचा प्रस्ताव असून, 60 टक्के निधी केंद्र सरकार आणि 40 टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. सविस्तर आराखडा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सागरी मंडळाने खासदार रवींद्र वायकर यांना दिली असून, या प्रकल्पामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: लोकलच्या गर्दीतून सूटका! आता ‘जल मेट्रो’ सुसाट, 10 मार्गांचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात!





